Latest

Indian Railway: भारतीय रेल्वेची ‘१४ मिनिटांचा चमत्कार’ योजना; एकाच वेळी ‘वंदे भारत एक्सप्रेस’ची स्वच्छता

अविनाश सुतार


रोहे, भारतीय रेल्वेने "१४ मिनिटांचा चमत्कार" योजना राबवून वंदे भारत एक्सप्रेस गाड्या संपूर्ण देशभरात एकाच वेळी १४ मिनिटांच्या विक्रमी वेळेत स्वच्छ केल्या आहेत. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय रेल्वेने (Indian Railway)  प्रथमच ऐतिहासिक कामगिरी केली आहे.

मध्य रेल्वेवर सोलापूर – मुंबई, मुंबई – साईनगर शिर्डी आणि बिलासपूर – नागपूर वंदे भारत ट्रेनची अनुक्रमे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, साईनगर शिर्डी आणि नागपूर स्थानकावर स्वच्छता करण्यात आली आहे. भारतीय रेल्वेने आज (दि.१) रेल्वे, दळणवळण आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या समर्थ मार्गदर्शनाखाली इतर मान्यवरांच्या उपस्थितीत व्हिडिओ लिंकद्वारे स्वच्छता पंधरवड्याचा एक भाग म्हणून सर्वात उल्लेखनीय हा उपक्रम राबविला आहे. ही कामगिरी भारतीय रेल्वेच्या इतिहासात पहिल्यांदाच करण्यात आली आहे.

मध्य रेल्वेने वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनच्या रेकच्या दर्जेदार साफसफाईसाठी ही "अन्य टोकाच्या टर्मिनल स्थानकांवरील" नवीन "१४ मिनिटांचा चमत्कार" योजना स्वीकारली आहे. ही नवीन योजना आजपासून लागू करण्यात आली आहे.

याचा सराव सोलापूर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेस करीता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – साईनगर शिर्डी- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वंदे भारत एक्सप्रेस करीता साईनगर शिर्डी येथे आणि बिलासपूर – नागपूर – बिलासपूर वंदे भारत एक्सप्रेस करीता नागपूर येथे घेण्यात आला होता.

Indian Railway : ४४ सफाई कर्मचार्‍यांची ३ पथके नियुक्त

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे प्लॅटफॉर्म क्रमांक ८ वर ट्रेन आल्यानंतर आणि सर्व प्रवासी उतरल्याची खात्री केल्यानंतर १२.४२ वाजता साफसफाईची कारवाई सुरू झाली. ते १२.५६ वाजता विक्रमी १४ मिनिटांत पूर्ण करण्यात आले. ४४ सफाई कर्मचार्‍यांच्या ३ पथकांने केलेली साफसफाईची ही प्रक्रिया पूर्ण केली.

यासाठी स्वच्छतागृहे, रॅक, पटल, आसन, फ्लोरींग आणि कोचच्या बाहेरील भागांसह आतील भागांची सखोल साफसफाई करण्यासाठी टीमची स्थापना करण्यात आली आहे. शौचालयात पॅन सीट, काच इत्यादी साफ करण्यासाठी आणि कचरा गोळा करण्यासाठी ८ कर्मचाऱ्यांचा समावेश असलेली टीम ए नियुक्त केली आहे. ३२ कर्मचार्‍यांचा समावेश असलेली टीम बी डब्यातील जागा, स्नॅक टेबल, साइड पॅनेल्स साफ करणे आणि कोच फ्लोअर साफ करणे यासाठी नियुक्त केलेली आहे. सर्व डब्यांच्या खिडक्यांच्या साफसफाईसाठी ४ कर्मचार्‍यांचा समावेश असलेली टीम सी नियुक्त केली आहे.

ही सर्व प्रक्रिया १४ मिनिटांच्या विक्रमी वेळेत केले. यामध्ये २ मिनिटे बॅगमध्ये कचरा गोळा करण्यासाठी, ३ मिनिटे सीट आणि स्नॅक टेबल साफ करण्यासाठी, ३ मिनिटे पॅनेल आणि कोच साफ करण्यासाठी आणि ६ मिनिटे कोच फ्लोअरिंगच्या साफसफाईसाठी होती. हा उपक्रम आव्हानात्मक असला तरी, भारतीय रेल्वेने ही उल्लेखनीय कामगिरी करण्यासाठी नाविन्यपूर्ण दृष्टीकोन, तंत्र आणि उपकरणे स्वीकारली आहेत.

यापूर्वी दि. २८ सप्टेंबर २०२३ रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथे कॅरेज आणि वॅगन (C&W), रेल्वे संरक्षण दल (RPF), अभियांत्रिकी आणि वाणिज्यिक यासह विविध विभागातील कर्मचाऱ्यांच्या अखंड सहकार्याने यशस्वी चाचणी घेण्यात आली होती.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT