नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : 2002 च्या गुजरात दंगलीप्ररणी क्लीन चिट देणाऱ्या SITच्या अहवालाविरोधात दाखल करण्यात आलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. यामुळे याप्रकरणी तत्कालीन मुख्यमंत्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सुप्रीम कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने एसआयटीचा तपास अहवाल योग्य असल्याचे मान्य करत याचिका फेटाळली आहे. झाकिया जाफरी यांच्याकडून ही याचिका दाखल करण्यात आली होती. झाकिया जाफरी या माजी खासदार एहसान जाफरी यांच्या पत्नी आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने २००२ मध्ये गुजरात दंगलीमध्ये गोधरा ट्रेन नरसंहारासंबंधी राज्याच्या उच्च पदाधिकाऱ्यांना तसेच इतर संस्थांना 'क्लीन चीट' देण्याच्या विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) क्लोजर रिपोर्ट विरोधात जाकिया जाफरी यांच्या वतीने दाखल करण्यात आलेली याचिका शुक्रवारी सुप्रीम कोर्टाने फेटाळली. चौदा दिवसांमध्ये सुनावणी घेत न्यायमूर्ती ए.एम. खानविलकर यांच्या अध्यक्षतेखाली न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी आणि न्यायमूर्ती सीटी रविकुमार यांचा समावेश असलेल्या खंडपीठाने वरिष्ठ अधिवक्ता कपिल सिब्बल, एसआयटीचे वकील मुकुल रोहतगी तसेच गुजरात राज्याचे वकील सॉलिसिटर जनरल तुषार मेहतांचा युक्तीवाद ऐकला.
खंडपीठाने सुनावणी पुर्ण करीत ९ डिसेंबर २०२१ रोजी निकाल राखून ठेवला होता. २००२ च्या गुजरात दंग्यांदरम्यान गुलबर्ग हाउसिंग सोसायटी हत्याकांडात मारले गेलेले कॉंग्रेस आमदार एहसान जाफरी यांच्या पत्नी जाकिया यांनी एसआयटी अहवालाला आव्हान देत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. गोधरा हत्याकांडानंतर धार्मिक दंगे घडवून आणण्यासाठी राज्यातील उच्च अधिकाऱ्यांकडून कुठलेहे 'मोठे षडयंत्र' रचण्यात आला नाही, असा निर्वाळा अहवालातून देण्यात आला होता. याला, जाफरी यांनी आव्हान दिले होते.दरम्यान,उच्च न्यायालयाने जाफरी यांना पुढील तपासाची मागणी करण्याची स्वतंत्रता दिली होती.
प्रकरणाच्या महत्वाच्या पैलूंवर एसआयटीने तपास केलाच नाही. एसआयटीने पोलिसांची निष्क्रियतेसंबंधी तपासात अपर्याप्तता दिसून आली. अहमदाबाद शहर पोलिसांच्या नियंत्रण कक्षात अशोक भट्ट तसेच जदाफिया नावाच्या दोन मंत्र्यांची उपस्थिती, पोलीस अधिकार्यांचा मोबाईल फोन डेटा, वीएची संबंधी व्यक्तींची नियुक्ती वर प्रश्न सिब्बल यांनी उपस्थित केला होता. याचिकाकर्त्याकडून अधिकृत रेकॉर्डवरून एकत्रित करण्यात आलेले आणि प्रस्तुत केलेल्या पुराव्यावर एसआयटीने विचारात घेतले नाहीत. पंरतु,एसआयटीने त्यांचे काम पुर्ण केले असा युक्तीवाद रोहतगी यांनी केला होता.