Latest

चारपैकी एका संसदीय समितीचे अध्यक्षपद द्या; काँग्रेसचे लोकसभा अध्यक्षांना पत्र

अविनाश सुतार

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : संसदीय परंपरेचे पालन करण्यात येत नसल्याचा आरोप करीत काँग्रेसने नाराजी व्यक्त केली आहे. यासंबंधी पक्षाने लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र पाठवून संसदेच्या गृह, परराष्ट्र, संरक्षण अथवा अर्थ या चार प्रमुख समित्यांपैकी किमान एका समितीचे अध्यक्षपद द्यावे, अशी मागणी केली आहे.

सरकारने संसदीय समित्यांचा तमाशा मांडला आहे, अशा शब्दांत काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी पत्रातून नाराजी व्यक्त केली आहे. सरकार त्यांच्या कर्तव्यांना गांभीर्याने घेण्यास तयार नसल्याचा आरोप देखील त्यांनी केला. समित्यांमध्ये विरोधी पक्षाच्या भूमिकेकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. विरोधी पक्षांच्या संसदेतील महत्वाला कमी केले जात असल्याचा आरोप देखील चौधरी यांनी पत्रातून केला.

सरकार माहिती तंत्रज्ञान संबंधी समिती त्यांच्याकडे ठेऊ इच्छिते. परंतु, संसदेच्या महत्वपूर्ण समित्यांमधे विरोधी पक्षाला महत्त्‍वाची भूमिका देण्याची परंपरा असल्याचे चौधरी यांनी पत्रातून लोकसभा अध्यक्षांच्या निदर्शनास आणून दिले. १६ व्या लोकसभेत गृह, संरक्षण, परराष्ट्र तसेच अर्थ समित्यांपैकी प्रमुख तीन समित्या विरोधी पक्षाकडे होत्या. हे देखील त्यांनी पत्रात नमूद केले आहे.

सरकार जर माहिती तंत्रज्ञान संबंधित समिती घेऊ इच्छित असेल, तर प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसला परराष्ट्र समिती दिली जावी, अशी मागणी चौधरी यांनी केली. सरकार लोकशाहीचा उपहास करीत असल्याचे दिसून येत असून त्यांची पावले लोकशाही विरोधी असल्याचा आरोप चौधरी यांनी पत्रातून केला आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT