अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेसचे नगर जिल्हा माजी अध्यक्ष घनशाम शेलार यांनी आज समर्थकांसह भारत राष्ट्र समिती (बीआरएस) पक्षात प्रवेश केला. शेतकर्यांच्या कल्याणासाठी देशातील एकमेव पक्ष असल्याने हा प्रवेश केल्याचे शेलार यांनी 'पुढारी'शी बोलताना सांगितले. शेलार यांच्यासोबत कुकडी कारखान्याचे संचालक आबासाहेब शिंदे, पंचायत समितीचे माजी सदस्य विकास भैलुमे, चिंचोडी पाटीलचे शरद पवार, संजय आनंदकर यांच्यासह समर्थकांनीही भारत राष्ट्र समितीचा झेंडा हाती घेतला.
हैदराबाद येथे तेलांगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांची शेलार यांनी समर्थकांनी भेट घेतली. या भेटीदरम्यान तेलांगणा राज्याचा विकास कसा केला गेला याची माहिती मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी दिली. ते ऐकून प्रभावीत झालेल्या शेलार यांनी समर्थककांसह भारत राष्ट्र समितीत प्रवेश केला.
शेलार हे श्रीगोंदा तालुक्यातील राष्ट्रवादीचे महत्त्वाचे नेते होते. राष्ट्रवादीचे घड्याळ सोडत त्यांनी बीआरएसचा झेंडा हाती घेतला. शेलार हे आगामी विधानसभा निवडणूक लढविण्यास इच्छूक आहेत. तेथे राष्ट्रवादीने माजी आमदार राहुल जगताप यांच्यामागे पाठबळ उभे केल्याचे चित्र आहे. त्यामुळे उमेदवारीसाठी इच्छुक असलेले शेलार यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली.
हेही वाचा