Latest

‘राष्ट्रीय मराठी मोर्चा’ची स्थापना; भाजप नेते आनंद रेखी यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड

मोहन कारंडे

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रीय पातळीवर मराठी मतदारांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तसेच राजधानीत सामाजिक व सांस्कृतिक चळवळीनंतर राजकीय नेतृत्वाची फळी उभारण्याच्या दिशेने सर्व राज्यातील प्रमुख मराठी संघटना व मंडळानी एकत्रित येऊन देशातील पहिले मराठी राजकीय व्यासपीठ 'राष्ट्रीय मराठी मोर्चा' स्थापन केला आहे.

दिल्लीत गेल्या १२ वर्षांपासून भाजप मध्ये सक्रीय असलेले तसेच राजकीय कामकाजाची जाण व सचोटी असणारे भाजप नेते आनंद रेखी यांना राष्ट्रीय मराठी मोर्चाचे पहिले राष्ट्रीय अध्यक्ष बनवण्यात आले आहे. देशातील सर्व राज्यांमधील मराठी लोकांना राजकीय व्यासपीठ उपलब्ध व्हावे आणि आपल्या अडचणी व प्रश्न सोडवण्यासाठी प्रत्येक राज्यात तरुण व तडफदार चेहऱ्यांच्या माध्यमातून राजकीय नेतृत्व दिले जावे, हा या मागचा उदात्त हेतू आहे. "राष्ट्रीय मराठी मोर्चाचे प्रमुख उद्दिष्ट मराठी समाजातील मान्यवरांना महाराष्ट्राबाहेरील राज्यांमध्ये राजकीय चेहरा म्हणून पुढे आणणे व त्यांच्या पाठीशी भक्कम उभे राहणे हे आहे. या प्रयत्नामुळे देशात मोठ्या राजकीय वाटचालीची सुरुवात होईल. भविष्यात योग्य उमेदवारांना पुढे करून त्यांच्या पाठिशी भक्कमपणे उभे राहण्यासाठी सर्व मराठी बांधवांना एकत्रित येण्याची आवश्यकता आहे", असे नवनिर्वाचित अध्यक्ष आनंद रेखी यांनी स्पष्ट केले.

इतर राज्यांच्या व भाषिकांच्या राजकीय संघटना व मोर्चे देखील देशात आहेत. परंतु, ते सीमित राज्यांमध्येच सक्रीय आहेत. मात्र; राष्ट्रीय मराठी मोर्चा हा येणार्‍या काळात देशातील सर्व राज्यांमध्ये आपल्या शाखांची स्थापना करेल. लवकरच राष्ट्रीय व राज्य पातळ्यांवरील कार्यकारणी जाहीर करण्यात येतील, असे रेखी यांनी सांगितले.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT