पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ५०० आणि १००० च्या नोटबंदी निर्णयाची घोषणा करुन आज पाच वर्ष पूर्ण झाली. ८ नोव्हेबर २०१६ रोजी रात्री आठ वाजता मोदींनी याची घोषणा केली होती. त्याचवेळी पासून ५०० आणि १००० च्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या होत्या. या पाच वर्षात डिजिटल व्यवहारात काय बदल झाले? आकडेवारीचा विचार केला तर देशात नोटबंदीनंतर पाच वर्षांनंतरही चलनात नोटा वाढत आहेत. तसेच डिजिटल पेमेंट व्यवहारदेखील वेगाने वाढले आहे. नागरिकांकडून आता कॅशलेस पेमेंटवर भर दिला जात आहे.
नोटबंदीमध्ये ५०० आणि १००० च्या नोटांवर त्यावेळी बंदी आणली होती. यानंतर काही दिवसांनी ५०० आणि २००० रुपयांची नवी नोट आणली होती. यानंतर २०० रुपयांची नोटही सुरु करण्यात आली. नोटबंदीनंतर पुढचे अनेक महिने देशात गोंधळाचे वातावरण होते. नागरिकांना जुन्या नोटा जमा करण्यासाठी व नव्या नोटा घेण्यासाठी बँकांसमोर रांगेत उभ रहाव लागलं होतं. यामुळे काळा पैसा संपेल आणि रोखीचे चलन कमी होईल, असं सांगण्यात आले होते.
रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनूसार, नोटबंदीच्या अगोदर ४ नोव्हेंबर २०१६ ला चलनात राहणाऱ्या एकूण नोटांचे मुल्य १७.७४ लाख कोटी रुपये होते. पण हे मुल्य वाढत यावर्षी (२०२१) २९ ऑक्टोबर रोजी २९.१७ लाख कोटी रुपये झाले. म्हणजेच नोटबंदीनंतर आतापर्यंत मुल्याच्या बाबतीत, नोटांच्या चलनात सुमारे ६४ टक्के वाढ झाली आहे.
मागच्या एक वर्षाची तुलना केली तर ३० ऑक्टोबर २०२० ला चलनात असलेल्या नोटांचे मूल्य २६.८८ लाख कोटी रुपये होते. म्हणजेच कोरोना काळात मागच्या एका वर्षात नोटांचे चलनातील मुल्य ८.५ टक्क्यांनी वाढले. ३१ मार्च २०२१ पर्यंतच्या आकडेवारीनुसार, देशात चलनात असलेल्या एकूण नोटांच्या मुल्यात ५०० आणि २००० रुपयांच्या नोटांचा वाटा ८५.७ टक्के आहे. २०१९-२० आणि २०२०-२१ मध्ये २००० रुपयांच्या नव्या नोट छापण्यात आलेल्या नाहीत. खासकरुन मागच्या आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये नोटांच्या चलनात लक्षणीय वाढ झाली आहे.
एका अहवालानुसार, देशात डिजिटल व्यवहारात वाढ झाली आहे. क्रेडिट-डेबिट कार्ड, नेट बँकिंग, गुगप पे, फोनपे, युपीआय याद्वारे डिजिटल व्यवहार वाढले आहेत. युपीआयची सुरुवातही २०१६ मध्ये झाली होती. ऑक्टोबर २०२१ मध्ये सुमारे ७.७१ लाख कोटी रुपयांचे व्यवहार झाले आहेत. या महिन्यात एकूण ४२१ कोटींचे व्यवहार डिजिटल झाले आहेत.