नागपूर : पुढारी वृत्तसेवा प्रभू राम आपले दैवत आहेत, शिंदे गेले मी सुद्धा अयोध्येला जाणार आहे, आम्ही देखील रामनवमी आणि हनुमान जयंती साजरी केली, अयोध्येला जाण्यात काही गैर नाही. आम्हाला शिवाजी महाराजांचे हिंदुत्व मान्य आहे. सर्वसमावेशक हिंदुत्व आम्हाला मान्य आहे, असे प्रतिपादन प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले. हिंदुत्व ही संस्कृती आहे आणि या संस्कृतीमध्ये सगळ्यांना सामावून घेण्याची भूमिका शिव छत्रपतींची होती याकडे पटोले यांनी लक्ष वेधले. राज्यातील सरकार बिनडोक्याने काम करीत असल्याचा आरोप त्यांनी केला.
काँग्रेसच्या सभांची सुरवात नागपुरातून होणार आहे. एकंदर 6 सभा होणार असून, राहुल, प्रियंका गांधी आणि खरगे यांची सभा घेण्यात येणार आहे. ही महाविकास आघाडीची सभा नसुन काँग्रेसची सभा राहणार आहे, याबाबत 10 तारखेला ठाण्यात मिटिंग घेण्यात येणार असल्याची माहिती नाना पटोले यांनी दिली.
पहिली सभा या महिन्याच्या शेवटी होण्याची शक्यता आहे. नंतरच्या सभा कर्नाटक निवडणुकीनंतर घेणार आहोत. सहयोगी पक्षांच्या नेत्यांना देखील निमंत्रण राहील का हे नेतृत्व ठरवेल असे पटोले यांनी स्पष्ट केले. दरम्यान, ठाणे अध्यक्षांशी कालच बोलणे झाले त्यांनी यात्रेत सावरकर यांचा फोटो राहणार या विषयी नकार दिला आहे.
16 ची महाविकास आघाडीची सभा होऊ नये असे भाजपला वाटते, असा आरोप केला. माजी आमदार आशिष देशमुख यांच्या संदर्भात शिस्तपालन समितीची बैठक झाली. त्यांचेही म्हणणे ऐकून घेणे महत्वाचे आहे, आमच्या पक्षात हिटलरशाही नाही असे पटोले म्हणाले.
राज्यातील सरकार बिनडोक्याने काम करीत आहे, सरकार स्वतःसाठी जगत आहे, शेतकऱ्यांना द्यायला पैसे नसताना 1 हजार कोटींच्या जाहिराती दिल्या, पेट्रोल, गॅसच्या किमती कमी केल्या नाहीत, स्वतःसाठी जगणारे भाजप सरकार आहे.
ज्यांना गरज नाही त्यांनाही सुरक्षा देण्यात येत आहे, कशाची भीती आहे हे माहीत नाही असा चिमटा पटोले यांनी काढला. पुणे निवडणूक बाबतीत अजून कुठल्याही पक्षकडून उमेदवार जाहीर झालेला नाही. अखेर भाजप पुण्याची निवडणूक लावेल की नाही याबाबतच शंका आहे.
हेही वाचा :