पुढारी ऑनलाईन डेस्क : 'कोण भोंगेधारी कोण पुंगीधारी, हे तर मार्केटिंगच युग सुरू आहे' अशी खोचक टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केली. एका मुलाखतीमध्ये त्यांनी विरोधकांसह राज ठाकरेंच्या औरंगाबाद सभेचा चांगलाच खरपूस समाचार घेतला.
यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, " शिवसेनेनं कधीच झेंडा बदलेला नाही. काहींना रोज झेंडे का बदलावे लागतात ?. त्यांचा आता मराठीनंतर हिंदूत्वावर खेळ सुरू आहे. असल्या नव्या खेळाडूंकडे मी लक्ष देत नाही. असले माकडचाळे लोकांनाही समजतात".
कौतुक करण्यासाठी शेजारी पाजारी शोधावे लागतात, महाविकास आघाडीचे कौतुक कराण्याचा मोठेपणा राज ठाकरेंकडे नाही. असे भोंगेधारी खूप पाहीले आहेत, असा टोलाही त्यांनी या वेळी लगावला.
हनुमान चालीसा पठणाची नौटंकी करणाऱ्यांना हाताशी धरणारे खूप आहेत. राणा दाम्पत्यांना हाताळण्याची गरज नाही त्यांना हाताळण्यासाठी माझ्याकडे खूप हात आहेत, असा इशाराही त्यांनी दिला. राजकारणात हे मार्केटिंगचे युग सुरू झाले आहे, भोंगेधारी, पुंगीधारी मार्केटींग करत आहेत, असा टाेलाही त्यांनी लगावला.
सुप्रीम कोर्टानं भोंग्यांबाबत दिलेल्या निर्णयावर बोलत असताना ते म्हणाले की, "कोर्टाच्या निर्णयानूसार केंद्रानं भोंग्याबाबत आवाजाची मर्यादा ठरवावी. अजाणतेपणाने भोंग्यांबाबत राजकारण सुरू केलेले आहे. भोंग्याबाबतची आवाजाची मर्यादा सर्वांना पाळावीच लागेल. भोंग्याबाबत कोर्टाचा निकाल सर्वधर्मियांना लागू आहे.भोंगा बंदी संपूर्ण देशात लागू करा. असे आवाहन त्यांनी केंद्र सरकारला दिले.
. सत्तेसाठी सुडाने वागण्याचा प्रयत्न करू नका. महाराष्ट्राला लढ म्हणून सांगायची काहीच गरज नाही. वेळ पडल्यास महाराष्ट्र लढायला तयार आहे. महाराष्ट्र आणि बंगालची अस्मिता चिरडता येणार नाही.कोरोना काळात विकासकामे सुरूच होती. रिकाम्या थाळ्या वाजवून कोरोना गेला नाही. महाराष्ट्रानं कोरोना काळात आणि नंतरही चांगलं काम केलं आहे. कायदा सुव्यवस्थेबाबत केंद्रानंही लक्ष ठेवावं. उत्तर प्रदेशात कीती बळी गेले, असा सवालही त्यांनी केंद्र सरकारला केला.
हेही वाचा