पुढारी ऑनलाईन डेस्क : देशात पुन्हा एकदा कोरोना रूग्णांची संख्या वाढू लागली आहे. तर दुसरीकडे अंदमान आणि निकोबार बेटांवरून दिलासादायक वृत्त समोर आले आहे. अंदमान पुन्हा एकदा कोरोनामुक्त (COVID – 19 ) घोषित करण्यात आला आहे. अंदमान येथे २३ एप्रिल रोजी एक व्यक्ती कोरोना बाधित आढळून आली होती, त्या व्यक्तीला ३० एप्रिल रोजी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. दरम्यान, गेल्या २४ तासांत देशात ३३२४ नवीन रुग्ण आढळले आहेत. दिल्लीत मागील २४ तासांमध्ये १५२० नवे रुग्ण आढळले, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, २४ तासांत ४० जणांचा कोरोनामुळे (COVID – 19) मृत्यू झाला आहे. शनिवारी ५० जणांचा मृत्यू झाला असून, एकूण मृतांची संख्या ५,२३,८४३ वर पोहोचली आहे. मृतांच्या संख्येसोबतच नवीन बाधितांची संख्याही कमी झाली आहे. शनिवारी देशात ३६८८ बाधित आढळले . मात्र, रविवारी ३६४ रुग्ण कमी झाले आहेत. त्याचवेळी, गेल्या २४ तासांत २,८७६ लोकांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
आतापर्यंतच्या आकडेवारीवर नजर टाकली, तर देशात सध्या १९,०९२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.आतापर्यंत ४,२५,३६,२५३ लोक कोरोनापासून बरे झाले आहेत. १,८९,१७,६९,३४६ लोकांचे लसीकरण झाले आहे.
कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले की, रूग्णांची संख्या वाढत राहिल्यास राज्यात मास्क घालणे बंधनकारक करावे लागेल. ते म्हणाले, कोरोना लसीकरणाला गती देणे आणि मुलांचे लसीकरण सुनिश्चित करणे हे सध्या आमचे उद्दिष्ट आहे. यावेळी त्यांनी लोकांना कोरोना प्रोटोकॉलचे पालन करण्याचे आवाहनही केले.
हेही वाचलंत का ?