महाराष्ट्राने अशा ‘सुपारी’ सभा खूप पाहिल्या : ‘राज’सभेवर सुभाष देसाई यांची टीका | पुढारी

महाराष्ट्राने अशा 'सुपारी' सभा खूप पाहिल्या : 'राज'सभेवर सुभाष देसाई यांची टीका

औरंगाबाद; पुढारी वृत्तसेवा : मनसे कुठलेही भूमिकेवर ठाम राहत नाही. आधी मराठी होते, आता भोंगा भोंगा सुरू आहे. तोही किती दिवस टिकतो, हे बघावे लागेल. कोणी कितीही चिथावणी दिली तरी जनता सुज्ञ असून महाराष्ट्राने अशा ‘सुपारी’ सभा खूप पाहिल्या आहेत,  अशी बाेचरी टीका राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी आज ‘राज’सभेवर केली.

भोंगा कमळाला किती त्रास देतो हे पुढच्या काळात कळेलच

राज्य स्थापनेच्या वर्धापन दिनानिमित्त उद्योगमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते रविवारी औरंगाबाद येथे मुख्य ध्वजारोहण झाले. यानंतर माध्यमांशी बोलताना देसाई यांनी राज ठाकरे यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, “आता कुणी नवे नवे कार्यक्रम घेत आहेत ते किती दिवस टिकतात तेही दिसतच आधी मराठी होते आता भोंगा सुरू आहे. भोंगा आणि ‘कमळा’चे नाते झाले आहे. आता हा भोंगा कमळाला किती त्रास देतो हे पुढच्या काळात कळेलच असेही देसाई म्हणाले.

भोंगाच्या मुद्द्यावरून शहराची सामाजिक शांतता बिघडण्याच्या मुद्द्यावर देसाई म्हणाले, त्याची काळजी घेण्यासाठी पोलिस प्रशासन सक्षम असून शांततेला गालबोट लागणार नाही. कोणी कितीही चिथावणी दिली तरी जनता डोकी भडकावून घेणार नाही, लोक चाणाक्ष आहेत.

शिवसेनेचे हिंदुत्वाशी अभेद्य नाते

शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबाद शहराला संभाजीनगर असे नाव दिले. येथील नागरिक ती आठवण आजही जतन करत असून शिवसेनेचे हिंदुत्वाशी अभेद्य नाते असल्याचे देसाई म्हणाले.

हेही वाचा

Back to top button