नवी दिल्ली ; पुढारी वृत्तसेवा : देशात सहा अणुभट्ट्या उभारण्यास केंद्र सरकार ने तत्वत: मंजुरी दिली आहे. सरकारच्या निर्णयानंतर महाराष्ट्रातील जैतापूर सह इतर प्रस्तावित अणुऊर्जा भट्ट्याचा मार्ग मोकळा झाला आहे. प्रत्येकी १,६५० मेगावॅट क्षमतेच्या सहा अणुभट्ट्या फ्रान्सच्या तांत्रिक सहकार्याने उभारल्या जाणार आहेत. एकूण ९,९०० मेगावॅट क्षमतेसह हे देशातील सर्वात मोठे अणुऊर्जा निर्मितीचे ठिकाण असेल, अशी माहिती केंद्रीय अणुऊर्जा राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरातून दिली. (Jaitapur Atomic Energy Project)
महाराष्ट्रात अणुऊर्जा प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यातील जैतापूर येथे उभारण्याचा प्रस्ताव आहे. सध्या, सरकार फ्रेंच फर्म ईडीएफ सोबत प्रकल्प प्रस्तावावर पोहोचण्यासाठी तांत्रिक-व्यावसायिक चर्चा करीत असल्याचे ते म्हणाले.
अणुऊर्जा स्वच्छ व पर्यावरणास अनुकूल आहे. त्याशिवाय देशाची दीर्घकालीन ऊर्जा सुरक्षा शाश्वत आधारावर सुनिश्चित करण्याची प्रचंड क्षमता आहे, असे सिंह म्हणाले. अणुऊर्जा प्रकल्पांनी आतापर्यंत सुमारे ७५५ अब्ज युनिट वीज निर्माण केली आहे. ज्यामुळे सुमारे ६५० दशलक्ष टन सीओ२ उत्सर्जनाची बचत झाली आहे.
देशात सध्या स्थापित अणुऊर्जा क्षमता ६,७८० मेगावॅट आहे आणि २०२०-२१ मध्ये एकूण वीज निर्मितीमध्ये अणुऊर्जेचा वाटा सुमारे ३.१ टक्के इतका आहे, अशी माहिती त्यांनी अणुऊर्जा क्षमतेबाबत आणखी एका प्रश्नाला दिलेल्या लेखी उत्तरातून दिली.
अणुऊर्जेसह विविध स्वच्छ उर्जा स्त्रोतांच्या संयोजनातून प्रदुषणमुक्तीचे लक्ष्य पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर २०३१ पर्यंत ६,७८० मेगावॅटची सध्याची अणुऊर्जा क्षमता २२,४८० मेगावॅटपर्यंत वाढवणे अपेक्षित आहे.
भविष्यात आणखी अणुऊर्जा अणुभट्ट्या उभारण्याचे नियोजन असल्याचे सिंह म्हणाले.
संसदेत सरकार कडून सादर करण्यात आलेले उत्तर तांत्रिक होते.
गेल्या काही वर्षात किमान सहा वेळा सरकार कडून असे उत्तर देण्यात आले असल्याची माहिती शिवसेना नेते खासदार विनायक राऊत यांनी दिली. स्थानिक या प्रकल्पाच्या विरोधात आहे.
या प्रकल्पामुळे कोकण किनारपट्टीवर प्रतिकूल प्रभाव पडेल.
स्थानिकांसोबत शिवसेना उभी आहे. केंद्राकडून सौर ऊर्जेच्या वापरासंबंधी प्रचार-प्रसार होतांना कोकणात अणुऊर्जेची आवश्यकता काय आहे? असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला.
कोकणात सौर पार्क बनवले जाऊ शकतात, असा सल्ला त्यांनी केंद्राला दिला.