पुणे; पुढारी वृत्तसेवा : अरबी समुद्रातील चक्रीवादळ मुंबई व गोवा किनारपट्टीपासून 900 कि.मी.वर आले आहे. मात्र ते पाकिस्तानच्या दिशेने समुद्रातून जाणार असल्याने मुंबईचा धोका टळणार आहे. दरम्यान, बंगालच्या उपसागरात शुक्रवारी दुपारी कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने नव्या चक्रीवादळाची हालचाल सुरू झाली आहे. एकाच वेळी दोन्ही उपसागरात चक्रीवादळांच्या हालचालींचा यंदा दुर्मीळ योग पाहावयास मिळणार आहे. यामुळे मान्सूनला आणखी गती मिळेल, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
गेल्या तीन दिवसांपासून अरबी समुद्रात बिपोर जॉय या महाचक्रीवादळाचा प्रवास वेगाने सुरू आहे. शुक्रवारी हे वादळ मुंबई व गोवा किनारपट्टी वळून पुढे सरकले. ते आता गुजरात किनारपट्टीकडून पाकिस्तानकडे जाण्याची शक्यता आहे. सध्या चक्रीवादळ गोवा किनारपट्टीपासून 790 किमी, मुंबई पासून 810 किमी, पोरबंदरपासून 1100 किमी अंतरावर आहे.
अरबी समुद्रात चक्रीवादळाचा प्रवास सुरू असतानाच बंगालच्या उपसागरात नव्या चक्रीवादळाची निर्मिती होत आहे. शुक्रवारी दुपारच्या सुमारास बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून आगामी 48 तासांत त्याचे तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यात व पुढे चक्रीवादळांत रूपांतर होईल.