नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : काश्मीरी पंडितांची टिंगल उडविल्याचा आरोप झालेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरावर बुधवारी भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी हल्लाबोल केला. केजरीवाल यांच्या घरावर असामाजिक तत्त्वांनी हल्ला केला असून सुरक्षा बॅरियर व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तोडफोड केली असल्याचे उपमुख्यमंत्री मनीष शिसोदिया यांनी सोशल मीडियाद्वारे सांगितले. आपचा निवडणूकीत पराभव न करू शकल्याने भाजप अरविंद केजरीवाल यांची हत्या करण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावाही शिसोदिया यांनी केला.
पोलिसांच्या उपस्थितीत भाजप कार्यकर्त्यांनी हा हल्ला केल्याचा आरोप आम आदमी पक्षाकडून करण्यात आला आहे. जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या काश्मीरी पंडितांच्या शिरकाणावर केजरीवाल यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. शिवाय पंडितांच्या पलायनावर बनविण्यात आलेल्या 'दि काश्मीर फाईल्स' चित्रपटावरील कर माफ करण्यास नकार देत सदर चित्रपट यूट्यूबवर टाकण्याचा सल्ला दिला होता. केजरीवाल यांच्या या भूमिकेवर गेल्या काही दिवसांपासून भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यातूनच भाजप युवा कार्यकर्त्यांनी बुधवारी केजरीवाल यांच्या घरावर हल्लाबोल केला. खासदार तेजस्वी सूर्या यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले.
तेजस्वी सुर्या यांच्या नेतृत्वाखाली आयपी महाविद्यालय ते केजरीवाल यांच्या निवासस्थानापर्यंत मोर्चा काढण्यात आला. यानंतर मोर्चाला हिंसक वळण लागले. भाजप कार्यकर्त्यांनी घरासमोरील मुख्य फाटक तोडून टाकले. केजरीवाल यांच्या घरावरील हल्ल्यामागे भाजप असल्याचा आरोप आम आदमी पक्षाने केला आहे. पंजाबमधील पराजय पचवता न आल्याने अशा प्रकारचे हल्ले केले जात असल्याचे आपने म्हटले आहे. दिल्ली विधानसभेत केजरीवाल यांनी केलेल्या भाषणावर सारवासारव करताना आपण काश्मीर फाईल्स हसलो नव्हतो तर भाजपवर हसलो होतो, असे सांगितले होते. मात्र सदर विषयावरून अजूनही राडेबाजी सुरुच आहे.