पुढारी ऑनलाईन: बिहारच्या सासाराम (जि. रोहतास) येथे रामनवमी दिवशी घडलेल्या हिंसाचारानंतर शनिवारी (दि.2) बॉम्बस्फोटाची घटना घडली. या घटनेत पाच जण गंभीर जखमी झाले तर एकजणाचा मृत्यू झाला आहे. जखमींवर बीएचयू रुग्णालयात उपचार सुरू आहे. घटनेनंतर फॉरेन्सिक टीमने घटनास्थळी पोहचून तपास सुरू केला आहे, अशी माहिती सासारामचे डीएम धर्मेंद्र कुमार यांनी दिली आहे.
बिहारमधील सासाराम आणि बिहार शरीफ येथे गुरुवारी रामनवमीच्या मिरवणुकीदरम्यान उसळलेल्या हिंसाचारप्रकरणी आतापर्यंत ५० हून अधिक जणांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी आतापर्यंत ८ एफआयआर नोंदवण्यात आले आहेत. या भागात अतिरिक्त फौजफाटा तैनात केला जाणार असल्याची माहिती बिहारशरीफ, नालंदाचे एसपी अशोक मिश्रा यांनी दिली आहे.
पोलिसांनी एक निवेदन जारी केले आहे. त्या निवेदनात म्हटले आहे की, सासाराम आणि बिहार शरीफमध्ये पुर्वस्थिती प्रस्थापित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, परंतु खबरदारीचा उपाय म्हणून, वरिष्ठ पोलिस अधिकारी हिंसाचाराने प्रभावित भागात तळ ठोकून आहेत.
सदर भागात सैन्याचा मोठा बंदोबस्त करण्यात आला आहे. निवेदनानुसार, रोहतासचे जिल्हा मुख्यालय सासाराम येथे हिंसाचार आणि जाळपोळ केल्याप्रकरणी १८ जणांना अटक करण्यात आली आहे. तर बिहार शरीफ येथील मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा जिल्हा नालंदा येथे हिंसाचार प्रकरणी २७ जणांना अटक करण्यात आली आहे.
रामनवमीच्या उत्सवादरम्यान बिहारमधील अनेक शहरात हिंसाचाराची परिस्थिती उद्भवली आहे. मात्र सध्या येथील परिस्थिती सामान्य असून, अनेक शहारात कलम १४४ लागू करण्यात आले आहे. यामध्ये नालंदा, बिहार शरीफ या दोन शहराचा प्रामुख्याने समावेश आहे. तसेच या स्थितीत मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.