भिवंडी (संजय भोईर ) : युक्रेन -रशिया युद्धात (Ukraine-Russia war) अनेक जण होरपळत असताना वैद्यकीय शिक्षण घेण्याचे स्वप्न उराशी बाळगून भारतातून युक्रेन येथे गेलेले हजारो विद्यार्थी युक्रेनमध्येच अडकून पडलेले आहेत. त्यांना भारतात आणण्यासाठी केंद्र सरकारने मिशन गंगा अभियान राबवले आहे. तब्बल ८ दिवसांच्या खडतर प्रवासानंतर भिवंडी येथील मुस्कान फिरोज शेख अखेर घरी सुखरूप आली आणि सर्वांच्याच चेहऱ्यावर मुस्कान पसरले.
२०१८ पासून युक्रेनमधील कीव शहरात वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी गेलेली मुस्कान थेट ४ वर्षांनी घरी परतली. युक्रेनमध्ये खास करून कीव शहरावर सततच्या हल्ले होत असल्याच्या बातम्यामुळे कुटुंबियांची धास्ती वाढवत होती. अशा परिस्थितीत न्यूक्लिअर हल्ला होण्याचे संकेत मिळाल्यानंतर कीवमधील सर्व भारतीय विद्यार्थ्यांना शहर सोडण्याची सूचना दिली व मग २८ फेब्रुवारीपासून सुरू झाला मुस्कानचा भेदरलेला प्रवास.
कीवमध्ये तब्बल चार वर्षे राहिल्याने त्या शहरासोबत भावनिक नाते जोडले गेले होते. अशा परिस्थितीत शहर सोडताना सुंदर इमारतींचे भग्नावशेष मन सुन्न करायला लावत होते. तर रस्त्यावर ठिकठिकाणी मृत सैनिकांच्या शरीराचे अवशेष आढळून आले. ते बघताच मेट्रो स्थानक गाठले. परंतु तेथे युक्रेनियन नागरिकांना प्रथम प्राधान्य दिल्याने भारतीय विद्यार्थ्यांना मेट्रो मध्ये बसण्याची संधी दिली जात नव्हती. अखेर १५ मेट्रो ट्रेन नंतर भारतीय ८० विद्यार्थ्यांना एक डब्बा दिला. दाटीवाटीने अक्षरशः शौचालय जवळ बसून १२ तासांच्या प्रवासानंतर लविव व तेथून मजल दरमजल करीत युजोग्रोथ, चॉप, स्लोकियोवा, तेथून हंगरीच्या सीमेवर येऊन पोहचले. व त्या ठिकाणी चार दिवस अडकून पडल्यानंतर विमान प्रवासासाठी नंबर लागला, अशी आपबिती मुस्कान हिने सांगितली.
तीन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करून चौथ्या वर्षात शिक्षण घेत असताना युद्धामुळे मुस्कानसह हजारो विद्यार्थ्यांना शिक्षण अर्धवट सोडून मायदेश गाठावे लागले. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांना आपल्या मुलांच्या पुढील शिक्षणाची चिंता सतावत आहे. वडील फिरोज यांनी भारत सरकारने अर्धवट शिक्षण राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी भारतात संधी देण्याची विनंती केली आहे. तर मुस्कान हिने हंगरी, रोमानिया, पोलंड या देशातील विद्यापीठे तेथे शिक्षण देण्यासाठी उत्सुक असून तसे भारतात झाल्यास आनंद होईल, अशी प्रतिक्रिया दिली आहे .
मुस्कानने गोंडस क्लोई नावाचे एक मांजर पाळले होते. या संपूर्ण युद्ध परिस्थितीत कीव शहर सोडताना लळा लागलेल्या त्या मांजरीला तेथेच सोडणे मुस्कानसह तिच्या मैत्रिणींच्या जीवावर आले होते. परंतु एका बॅग मध्ये त्यांनी या मांजरीला टाकून आपल्यासोबत घेतले. परंतु शेवटच्या टप्प्यात एका विमानात पाच पाळीव प्राणी घेऊन जाण्याची मुभा दिल्याने मुस्कानकडील क्लोई सहावी ठरल्याने तिला तेथेच सोडून देण्याची वेळ आली होती. पण गुजरात येथील मैत्रीण तिच्या मदतीला धावून आली. आणि तिच्यासोबत दुसऱ्या विमानातून क्लोई सुखरूप गुजरातला पोहचली.
मला स्थनिक रशियन भाषा येत असल्याने तेथील स्थानिकांशी संवाद साधत त्यांच्या सोबत सोशल मीडियावर संवाद साधल्याने बँकर कोठे आहेत, औषधे, अन्न कोठे मिळणार याची माहिती मिळत गेली. यामुळेच यातना देणाऱ्या परिस्थितीत खंबीर राहून स्वतः सुरक्षित राहून येथ पर्यंतचा प्रवास केल्याचे मुस्कान शेख हिने सांगितले.
हेही वाचलंत का ?
पहा व्हिडिओ :"एक दिवस नको ३६५ दिवस महिलांचा सन्मान करा" – रूपाली चाकणकर | International Women's Day 2022