सांगली; पुढारी ऑनलाईन : तासगाव तालुक्यातील बलगवडे ग्रामपंचायतने शुक्रवारी (दि.२०) मासिक सभेमध्ये विधवा प्रथेविरुद्ध ठराव मंजूर केला. या बाबतची माहिती सरपंच जयश्री हरिराम पाटील यांनी दिली. असा ठराव करणारी बलगवडे ही सांगली जिल्ह्यातील पहिली तर राज्यातील चौथी ग्रामपंचायत ठरली आहे.
ग्रामपंचायीतच्या मासिक सभेमध्ये ग्रामसेवक विजयकुमार पाटील यांनी १७ मे रोजीचा विधवा प्रथेविरुद्धचा शासन निर्णय वाचून दाखवला. तर यावर साधकबाधक चर्चा होऊन ग्रामपंचायत सदस्य मिनाताई प्रकाश पाटील यांनी याबाबतचा ठराव मांडला. ग्रामपंचायत सदस्य सारिका बुधावले या ठरावास अनुमोदन देत सर्वसहमतीने ठराव मंजूर करण्यात आला. या अगोदर असा सुधारणावादी ठराव कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड, माणगाव, अकोला जिल्ह्यातील ढोरखेड ग्रामपंचायतीने मंजूर केले आहेत.
समाजात आजही विधवा महिलांना सामाजिक धार्मिक कार्यक्रमांत मान दिला जात नाही. भारतीय राज्यघटनेच्या नुसार महिलांना सन्मानाची वागणूक मिळणे आवश्यक आहे. त्यानुसार १७ मे रोजी महाराष्ट्र शासनाने एक आदेश काढून राज्यातील सर्व ग्रामपंचायतींनी विधवा प्रथेविरुद्ध ठराव करावेत, असे आदेश दिले आहेत. त्यानुसार बलगवडे ग्रामपंचायतीने महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार हा ठराव सर्व सहमतीने मंजूर केला.
या ठरावामध्ये म्हटले आहे की, गावामध्ये व राज्यामध्ये तसेच देशामध्ये विधवा महिलांना सन्मानाने जगता आले पाहिजे या करिता विधवा प्रथा बंद करण्यात येत आहे. यासंदर्भात महिला सहभागातून गावामध्ये जनजागृती करण्यात येईल.
सांगली जिल्ह्यातील पहिल्यांदा बलगवडे ग्रामपंचायतनीने हा ठराव मंजूर करावा यासाठी गावातील अनिल पाटील यांनी पुढाकार घेतला. यावेळी उपसरपंच श्रीकांत मोहिते, माजी उपसरपंच उध्दव शिंदे, सदस्य धनाजी शिंदे, महादेव माळी, सुवर्णा शिवाजी शिंदे, सचिन रघुनाथ पाटील, माजी सरपंच सुर्यकांत थोरात, अजित जाधव उपस्थित होते.
हा सुधारणावादी, पुरोगामी ठराव मंजूर केलेबद्दल या गावचे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पूर्णवेळ कार्यकर्ते राहुल थोरात यांनी सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक आणि सर्व सदस्यांचे पुस्तके व पुष्पगुच्छ अभिनंदन केले.
बलगवडे ग्रामपंचायतने विधवा प्रथेविरुद्धचा हा पुरोगामी ठराव आज मंजूर केला. यासाठी सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य आणि गावचे नेते अनिल पाटील यांचे आम्ही आभारी आहोत. गेली २२ वर्षें मी करत असलेल्या अंधश्रद्धा निर्मूलन कार्याला या ठरावाव्दारे माझ्या गावाने कृतीशील साथ दिली आहे, याचा मला अभिमान आहे.
– राहुल थोरात
राज्य कार्यकारी सदस्य, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती