अकोला ; पुढारी वृत्तसेवा : शहरातील अशोकवाटिका चौकातून बसस्थानकाकडे जाणाऱ्या उड्डाणपूलाखाली असलेली जलवाहिनी फुटल्याने सोमवारी सकाळी 170 कोटी रू. खर्चून तयार झालेल्या उड्डृाणपुलातून राख वाहून गेली. हा प्रकार थांबवण्यासाठी पाणीपुरवठा बंद करावा लागला. त्यामुळे शहरातील काही भागातील पाणीपुरवठा चार ते पाच दिवसांसाठी बंद करण्यात आला आहे.
या उड्डाणपुलाचे मागील सहा महिन्यांपूर्वीच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. सोमवारी पहाटे काही नागरिकांना उड्डाणपुला खालून पाण्यासोबत राख वाहत असल्याचे दिसले. तातडीने मनपा प्रशासनाला याची माहिती देण्यात आली. तेव्हा जलप्रदाय विभागाने तातडीने पाणीपुरवठा बंद केला.
जलवाहिनी दुरुस्तीचे काम सुरू असल्याने शहराच्या काही भागातील पाणीपुरवठा दोन दिवस विस्कळीत होणार आहे. पुलाबाबत कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, असे जिल्हाधिकारी नीमा अरोरा यांनी म्हटले आहे.
या प्रकारची स्थिती पुन्हा उत्पन्न होऊ नये म्हणून काळजी घेतली जात आहे. दुरूस्तीकडेही लक्ष दिले जात आहे. 600 एमएम आकाराची ही जलवाहिनी आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी यांच्यासह संबंधित अधिका-यांनी स्पष्ट केले की, दोन तीन दिवसात हा प्रश्न सोडवला जाईल. उड्डाणपूल अगदी उत्तम स्थितीत असून, कोणताही धोका नाही. संबंधित विभागाच्या अधिका-यांना येथील काम चार दिवसांत पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. उड्डाणपूल ते मूर्तिजापूर रोडकडे जाणारी वाहतूक थांबवण्यात आली आहे.
उड्डाणपूल उत्तम स्थितीत : श्रीकांत ढगे
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे उपमहाव्यवस्थापक श्रीकांत ढगे म्हणाले, उड्डाणपुलाला कोणताही धोका नाही. पुलाखालून जाणारी जलवाहिनी फुटल्याने पाण्याच्या दाबामुळे पुलाची फ्लाय अॅश वाहून गेली. त्यामुळे काळजीचे कारण नाही. लवकरच काम पूर्ण केले जाईल.
दोन तीन दिवस काही भागात जलपुरवठा प्रभावित : ताठे
मनपा जलप्रदाय विभागाचे अभियंता हरिदास ताठे म्हणाले, जलवाहिनी फुटल्यामुळे कालाचबुतरा आणि जुन्या शहराच्या काही भागातील पाणीपुरवठा दोन तीन दिवस विस्कळीत राहणार आहे. बसस्थानका नजीकच्या पाण्याच्या टाकीतून 600 एमएम वाहिनीद्वारे पाणी सोडण्यात येते. जलवाहिनी दुरूस्तीचे काम रात्रीच्या वेळी करण्यात येत आहे. तसेच, येथील काम झाले की, पाणीपुरवठा सुरळीत होईल.
हेही वाचा :