राशिवडे: पुढारी वृतसेवा: परिते (ता.करवीर) येथील भोगावती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध करावी, ही बाब स्वागतार्ह आहे. परंतु, भविष्यातील आर्थिक धोका ओळखून बिनविरोध संचालक मंडळाच्या कारभारावर अंकुश, नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा बँकेच्या अध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली जबाबदार नेत्यांची सुकाणू समिती निर्माण करावी, अशी मागणी गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी आज (दि.२०) पत्रकार बैठकीत (Kolhapur News) केली.
अध्यक्ष डोंगळे पुढे म्हणाले की, भोगावती साखर कारखाना स्थापन करत असताना माझे वडील स्वर्गीय गणपतराव आबाजी डोंगळे यांच्यासह तत्कालीन मान्यवर मंडळींनी खूप मोठे परिश्रम घेतले होते. हा कारखाना अतिशय चांगल्या पद्धतीने चालावा, ही आमची तळमळीची आपुलकीची भावना आहे. भोगावतीची निवडणूक बिनविरोध व्हावी, ही बाब कारखान्याच्या आणि सभासदांच्या हिताची (Kolhapur News) आहे.
मात्र, नियुक्त झालेले संचालक मंडळ अनियंत्रित कारभार करू लागले. तर प्रमुख नेत्यांच्या देखील हातात नियंत्रण राहत नाहीत. यासाठी भोगावती साखर कारखान्याला अर्थपुरवठा करणारी जिल्हा बँक प्रमुख असल्याने या बँकेच्या अध्यक्षांच्या नियंत्रणाखाली सक्षम, जबाबदार सुकाणू कमिटी तयार करावी. या कमिटीच्या देखरेखीखाली नूतन संचालक मंडळाने कारखान्याचा कारभार करावा, त्यामुळे कारखान्याला आर्थिक लाभ होण्याबरोबरच निवडणूक बिनविरोध केलेला मुख्य हेतू साध्य होईल, आणि कारभारावर अंकुश राहील.
जिल्ह्यातील मार्केट कमिटी, भोगावती शिक्षण संस्था या ठिकाणी काय घडत गेले, याचे ज्वलंत उदाहरण या परिसरात असताना भोगावती साखर कारखान्याच्या बाबतीत असेच घडत राहिले. तरी धोका निर्माण होण्याची भीती आहे. या सर्व गोष्टींचा गांभीर्याने विचार करून भोगावती पंचक्रोशीतील प्रमुख नेते मंडळींनी यावर निर्णय घ्यावा, असे मत यावेळी डोंगळे यांनी व्यक्त केले.
हेही वाचा