नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : देवभूमी हिमाचल प्रदेशमध्ये होवू घातलेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वीच राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांनी शनिवारी राज्याची राजधानी सिमला येथे पत्रकार परिषद घेवून विरोधक विशेषत: दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला.
दिल्लीचे मुख्यमंत्री राजधानीतील मौलवींना दरवर्षी १८ हजार रुपये देतात. मंदिराचे पुजारी, गुरूद्वारात धर्मग्रंथाची काळजी घेणारे तसेच खिश्चनांना १८ हजार रुपये देणार का ? आतापर्यंत तुम्ही त्यांना मदत का देवू शकले नाहीत? असा सवाल ठाकूर यांनी केला.
भारतीय चलनावर लक्ष्मी तसेच भगवान गणेश यांचा फोटो छापण्याचे आवाहन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केले होते.मुख्यमंत्र्यांच्या या आवाहनाचा समाचार अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांनी घेतला. राम मंदिराचा विरोध करणाऱ्या, हिंदू देवी-देवतांचा अपमान करणाऱ्या मंत्र्याला केजरीवाल यांना पदावरुन हटवावे लागले. केजरीवाल अराजकतेचे प्रतीक आहेत. त्यांनी केलेल्या भष्ट्राचारावर चर्चा होवू नये, यासाठी ते नवीन प्रचाराला प्रोत्साहन देतात, असा आरोप देखील ठाकूर यांनी केला.
ठाकूर यांनी कॉंग्रेसवर देखील टीकास्त्र डागले. भाजपने महागाई नियंत्रणात आणली तसेच इंधनाचे दरदेखील आटोक्यात आणले. भाजप शासित राज्यांमध्ये इंधनाचे दर कमी करण्यात आले आहेत. परंतु, काँग्रेस शासीत राज्यांमध्ये हे दर कमी करण्यात आलेले नाहीत. काँग्रेसने शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. परंतु, पंजाब, राजस्थान तसेच छत्तीसगढमध्ये त्यांनी अशाप्रकारची कुठलीही कर्जमाफी दिलेली नाही. काँग्रेस खोटे आश्वासन देत आहे, असा आरोप ठाकूर यांनी केला.
हिमाचल प्रदेशच्या निवडणुकीत यंदा भाजपने नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे. हे चेहरे पक्षाला विजयश्री मिळवून देण्यात सक्षम आहेत. भाजपमधील काही नाराज उमेदवार अपक्ष निवडणूक रिंगणात उभे आहेत, यावर भाष्य करताना ते म्हणाले, सर्वांना निवडणुकीचे तिकीट देणे शक्य नाही. नाराज नेत्यांची लवकरच मनधरणी केली जाईल.
हेही वाचलंत का ?