पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवुड अभिनेता अक्षय कुमार नेहमीच आपल्या चाहत्यांची मने जिंकत असतो. कधी त्याच्या अभिनयामुळे तर कधी त्याच्या ठाम भूमिकेमुळे तो प्रेक्षकांना नेहमीच आपलासा वाटतो. अक्षयने आता भारतीयांची मने जिंकण्यासाठी आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. त्याने कॅनडाचा पासपोर्ट नाकारला असून भारताचे नागरिकत्व मिळवण्यासाठी अर्ज केला आहे. (Akshay Kumar)
३० वर्षे बॉलीवुडमध्ये काम करुनही अक्षय आजही भारतीय नागरिक नव्हता. मात्र, भारताविषयीचे त्याचे प्रेम तो आपल्या भूमिकेतून, निर्णयांमधून व्यक्त करत असतो. दरम्यान अक्षय कुमारने कॅनडाच्या पासपोर्टचा त्याग करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. अक्षय कुमार एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाला, माझ्यासाठी भारत म्हणजेच सर्वकाही आहे. मी भारताच्या पासपोर्टसाठी अर्ज केला आहे. मी कॅनडाचे नागरिकत्व का घेतले? या विषयी कोणतीही माहिती नसताना लोक मला ट्रोल करतात याचे मला वाईट वाटते. (Akshay Kumar)
भारतच माझ्यासाठी सर्वकाही आहे. मी जे काही कमवले, जे काही मिळवले, ते भारताकडूनच मिळवले आहे. माझे भाग्य आहे की, मला पुन्हा एकदा भारताचा नागरिक होण्याची संधी मिळणार आहे, असेही अक्षय कुमार यावेळी बोलताना म्हणाला. अक्षय कुमारला त्याच्या कॅनडाच्या नागरिकत्वामुळे अनेकदा ट्रोलिंगला सामोर जावे लागत होते. अनेक राजकीय नेत्यांनीही त्याच्या कॅनडाच्या नागरिकत्वावरून टीका केली होती. (Akshay Kumar)