पुढारी ऑनलाईन डेस्क : विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर हे आमचे खास जावई आहेत, अशी नातेसंबंधावर भाष्य करत राष्ट्रवादीचे नेते व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मिश्किल टिप्पणी केली. आजपासून (दि.३) विधानसभेचे विशेष अधिवेशन सुरू झाले. पहिल्याच दिवशी अध्यक्षपदाची निवडणूक होऊन ॲड. राहुल नार्वेकर यांची १६४ मतांनी निवड झाली. त्याबद्दल नार्वेकर यांच्या अभिनंदन ठरावावर ते बोलत होते.
यावेळी जयंत पाटील म्हणाले की, "विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे विधान परिषदेचे अध्यक्ष रामराजे निंबाळकर यांचे जावई आहेत. त्याप्रमाणे आमचेही जावई आहेत. आमचे जावई मंत्री होतील, असे वाटत होते; परंतु त्यांची अध्यक्षपदी निवड झाली. याचा आम्हाला आनंद आहे. सुशिक्षित, कायद्य़ाचे ज्ञान असलेले विधानसभा अध्यक्ष झाले आहेत. याचा लाभ सभागृहाचे कामकाज करताना नार्वेकर यांना होईल. त्यांच्याकडून सर्वांना न्याय मिळेल."
सभागृहाचे कामकाज करताना नियमांचे पालन व्हावे, याबाबत त्यांनी लक्ष देऊन सूचना द्यावेत. या सूचना सर्व सदस्यांनी पाळाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त करतो. सदस्यांनीही सभागृहाचा मान राखून नियमांनुसारच वर्तन करावे. सभागृहाची शिस्त सर्वांनी पाळली पाहिजे, अशी अपेक्षा पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.
जपासून विधानसभेचे विशेष अधिवेशन सुरू झाले आहे. पहिल्याच दिवशी अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली. या निवडणुकीसाठी राज्य सरकारच्या वतीने ॲड. राहुल नार्वेकर यांना उमेदवारी देण्यात आली होती. या निवडणुकीत नार्वेकर बहुमताने विजयी झाले आहेत. त्यांना १६४ मते मिळाली. तर त्यांच्या विरोधात उभे असलेले राजन साळवी यांना १०७ मते मिळाली. या निवडणुकीत साळवी यांना मत देण्यासाठी शिवसेना पक्षाने आपले सर्व आमदार तसेच सहयोगी आमदारांना व्हीप बजावला होता. हा व्हीप पक्षाच्या उर्वरित १६ आमदारांना देखील लागू असेल, असे व्हीपमध्ये म्हटले होते. शिंदे गटाच्या आमदारांनी भाजपच्या राहुल नार्वेकर यांच्या बाजूने मतदान करून शिवसेनेचा व्हिप पाळला नाही.
हेही वाचलंत का ?