पुढारी ऑनलाईन डेस्क : रवींद्र जडेजा हा 'आशिया चषक' स्पर्धेत जखमी झाल्यानंतर विश्वचषक स्पर्धेतूनही बाहेर पडला होता. त्याच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. रवींद्र जडेजा आशिया चषक स्पर्धेत ग्रुप स्टेजच्या सामन्यात खेळला. परंतु, दुखापतीमुळे सुपर ४ मध्ये होणारे सामने त्याला खेळता आले नाहीत. बीसीसीआयने याबाबत अधिकृत घोषणा केली होती. आशिया चषक स्पर्धेतील उर्वरित सामने त्याला दुखापतीमुळे खेळता आले नव्हते.
दरम्यान, श्रीलंकेचा माजी खेळाडू माहेला जयवर्धने याने रवींद्र जडेजाबाबत मोठे विधान केले आहे. रवींद्र जडेजा विश्वचषकासाठी उपलब्ध नसणे, हे भारतीय संघाचे मोठे नुकसान असल्याचे आयसीसी रिव्ह्यू या कार्यक्रमात जयवर्धने म्हणाला आहे. माहेला जयवर्धने यावेळी बोलताना म्हणाला की, अष्टपैलू खेळाडू म्हणून रवींद्र जडेजा भारतीय संघासाठी महत्वपूर्ण आहे. आशिया चषकात तो अतिशय चांगली फलंदाजी करत होता. जडेजा आणि हार्दिक पंड्या संघात असल्याने भारताला दोन अष्टपैलू खेळाडूंचा पर्याय उपलब्ध होता.
आशिया चषक स्पर्धेत विराट कोहलीने अफगानिस्तानविरोधात शतक झळकवले ही भारतीय संघासाठी चांगली बाब आहे. विराट कोहली सतत चांगली कामगिरी करत होता. मात्र, अफगानिस्तानविरूद्ध झळकवलेल्या शतकाने त्याला आत्मविश्वास मिळेल, असेही माहेला जयवर्धने यावेळी बोलताना म्हणाला.