दिल्ली-हरियाणाच्या सिंघू सीमेवरून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. शेतकरी आंदोलन सुरू असलेल्या ठिकाणी एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. दरम्यान तरुणाचा मृतदेह लटकवत बॅरिकेडला त्याचा हात बांधण्यात आला. ही घटना सिंघू सीमेवर घडली आहे. मागच्या ११ महिन्यापासून शेतकरी कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करत आहेत त्याच ठिकाणी ही घटना घडली आहे. (Man Killed At Singhu Border)
मिळालेल्या माहितीनुसार, तरुणाचा मृतदेह आंदोलकांच्या मुख्य स्टेजजवळ बॅरिकेडला लटकलेला आढळला. मृतदेह सापडल्यानंतर घटनास्थळी खळबळ उडाली यावेळी लोकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. काही काळ वातावरण तणावाचे बनले होते.
यावेळी पोलिसांना मृतदेहाजवळ जाण्याचीही परवानगी दिली जात नव्हती, परंतु पोलिसांनी मार्ग काढत तेथे पोहोचून मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, हत्येपूर्वी तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली.
हत्येनंतर त्याचा मृतदेह बॅरीकेडला दोन्ही हातांच्या मदतीने लटकवण्यात आला आणि उजवा हातही कापून मृतदेहाला बांधण्यात आला. सध्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही.
दरम्यान मृत युवकावर गुरु ग्रंथ साहिब यांची विटंबना केल्याचा आरोप आहे, त्यामुळे आंदोलन स्थळी उपस्थित असलेल्या निहंगांनी ही घटना घडवून आणल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
याचबरोबर पोलीस घटनास्थळावर आले त्यावेळी निंहगा लोकांनी पहिल्यांदा गोंधळ घालण्यास सूरुवात केली.
दिल्ली-हरियाणाच्या विविध सीमांवर, ४० शेतकरी संघटनांच्या संयुक्त किसान मोर्चाच्या नेतृत्वाखाली, केंद्र सरकारच्या तीन नवीन कृषी कायद्यांच्या विरोधात निदर्शने सुरू आहेत. पुढच्या महिन्यात या आंदोलनाला एक वर्ष पूर्ण होणार आहे. सरकार आणि शेतकरी संघटनांमध्ये चर्चा झाल्या, पण आतापर्यंत कोणताही ठोस निर्णय झाला नाही.