अमरावती; पुढारी वृत्तसेवा : अमरावती शहराच्या विविध भागात मोठ्या प्रमाणात गांजाची विक्री होत असल्याचे दिसून येत आहे. शहराच्या आजूबाजूला असलेल्या निर्जनस्थळी गांजाचे व्यसन असलेल्या युवकांचे टोळके सदैव दृष्टीस पडतात. याचा त्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना देखील त्रास सहन करावा लागतो. ही बाब लक्षात घेता पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत बडनेरा शहरातील पाच बंगला येथून तब्बल ९ लाख ९३ हजार रुपयांचा गांजा जप्त केला. या कारवाईत अमरावती शहरातील तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
अमरावती येथील रतनगंज गवळीपुरा नागोबा मंदिर निवासी नईम शहा वल्द नकीम शहा (वय ४९), यास्मिन नगरातील सुंनीत मज्जित जवळील निवासी हबीब शहा वल्द हुसेन शहा (वय ५०) तसेच हाजरा नगर पाण्याच्या टाकी जवळील निवासी शेख वसीम वल्द शेख अयूब (वय ३२) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.
गुन्हे शाखेचे पथक गस्तीवर असताना गांजाची तस्करी होत असल्याची माहिती त्यांना मिळाली. बडनेरा येथील पाच बंगला परिसरात तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून ३३ किलो २५० ग्रॅम असा एकूण ९ लाख ९७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याबाबत तिघांना विचारणा केली असता हा गांजा आझादनगर अमरावती येथील शेख इमरान उर्फ गोलू अण्णा शेख कादर याचा असल्याची माहिती दिली. आरोपींविरोधात बडनेरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अर्जुन ठोसरे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक राजकिरण येवले, अजय मिश्रा, जावेद अहमद, सुधीर गुडदे, गजानन ढेवले, दीपक सुंदरकर, एजाज शहा, चेतन कराळे, योगेश पवार, जगन्नाथ लुटे यांच्या पथकाकडून ही कारवाई करण्यात आली.
हेही वाचलंत का ?