अंबाजोगाई, पुढारी वृत्तसेवा : लातूर- अंबाजोगाई महामार्गावर नंदगोपाल डेअरी नजीक शनिवारी (दि.२३) सकाळी १० च्या सुमारास ट्रक आणि क्रुझर जीपचा भीषण अपघात झाला. या अपघातात ८ जण ठार तर ९ जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. अरुंद महामार्गामुळे बर्दापूर ते अंबासाखर दरम्यान सातत्याने अपघाताच्या घटना घडत आहेत.
अंबाजोगाई तालुक्यातील राडी येथे शनिवारी मावंद्याचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमासाठी लातूर जिल्ह्यातील साई आणि आर्वी येथून नातेवाईक क्रुझर गाडीतून निघाले होते. त्यांची गाडी बर्दापूरच्या पुढे नंदगोपाल डेअरीजवळ आली असता क्रुझर जीपला समोरून भरधाव वेगात येणार्या ट्रकने जोराची धडक दिली. अपघात एवढा भीषण होता की, क्रुझर जीपचा अक्षरश: चेंदा- मेंदा झाला. या भीषण अपघातात क्रुझरमधील ८ जण ठार झाले तर १० जण जखमी झाले.
मृतांमध्ये निर्मला सोमवंशी (38), स्वाती बोडके (35), शकुंतला सोमवंशी (38), सोजरबाई कदम (37), चित्रा शिंदे (35), चालक खंडू रोहिले (35), कमल जाधव (30) आणि एका अनोळखीचा समावेश आहे. तर राजमती सोमवंशी (50), सोनाली सोमवंशी (25), रंजना माने (35), परिमला सोमवंशी (70), दत्तात्रय पवार (40), शिवाजी पवार (45), यश बोडके (9), श्रुतिका पवार (6), गुलाबराव सोमवंशी (50) आणि हे 9 जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. मृतात चालक व महिला आणि बालकांचा समावेश आहे.
अपघाताची माहिती मिळताच पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे स्वीय सहाय्यक खंडू गोरे, रणजीत लोमटे, तानाजी देशमुख यांनी रूग्णालयात धाव घेतली. दरम्यान, अंबाजोगाईच्या अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय अधिकारी शरद झाडके, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील जायभाये यांनी रुग्णालयात भेट देऊन जखमींची विचारपूस केली.
हेही वाचलंत का ?