पुढारी ऑनलाईन डेस्क : आसामच्या अनेक भागांत वादळ (lightning) आणि पावसाने थैमान घातले असून, सुमारे २१ हजार नागरिकांना याचा फटका बसला आहे. राज्यात विविध ठिकाणी वीज कोसळून १४ जण ठार झाले, अशी माहिती आसामच्या राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिली आहे.
आसाममध्ये उन्हाळ्यात वादळ (lightning) आणि पाऊस एकाच वेळी पडतो. या नैसर्गिक आपत्ती 'बोरदोइसिला'असे म्हणतात. 'बोरदोइसिला'ने अनेक भागांत थैमान घातले आहे. त्यामुळे सर्व जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी झाडे काेसळली आहेत. वीजवाहिन्या तुटल्या आहेत. अनेक भाग अंधारात गेला आहे. गोलपारा, बारपेटा, डिब्रुगड या भागांमध्ये सुमारे ७ हजारांपेक्षा अधिक घरांचे नुकसान झाले आहे. डिब्रुगडमध्ये शुक्रवारी मोठे वादळ आले. यात ४ जणांचा मृत्यू झाला. तर मेघालयच्या री-भोई जिल्ह्यात वादळामुळे सुमारे १ हजार घरांचे नुकसान झाले आहे. बीडीओ कार्यालय, शाळा, पशुसंवर्धन कार्यालयाची वादळामुळे पडझड झाली आहे. भूस्खलन होऊन दोन जण ठार झाले आहेत.
येत्या पाच दिवसांत अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये पाऊस किंवा विजांचा कडकडाट होण्याचा अंदाज आहे. भारताच्या दक्षिणेकडील राज्यांमध्ये वादळ, पाऊस आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. १८ एप्रिलपासून पश्चिम भारतात 'वेस्टर्न डिस्टर्बन्स'चा परिणाम होईल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.
हेही वाचलंत का ?