पुढारी ऑनलाईन डेस्क : टी-२० क्रिकेटमधील थरार आणि उत्कंठा रविवारी ( दि.९ ) आयपीएल स्पर्धेतील कोलकाता विरुद्ध गुजरात सामन्यात पाहण्यास मिळाली. कोलकाताच्या रिंकू सिंग याने अखेरच्या षटकात सलग पाच षटकार फटकावत अशक्य असणारा विजय शक्य केला. या पाच चेंडूवर केलेल्या खेळीमुळे क्रिकेटप्रेमींमध्ये रिकू सिंग याच्या नावाची चर्चा सुरु झाली. या अविस्मरणीय विजयानंतर भावूक झालेल्या रिंकूने आजवरच्या आपला संघर्ष सांगितला. तसेच त्याने हा विजय आपल्या आई-वडिलांना समर्पित केला आहे. ( Rinku singh KKR )
यंदाच्या आयपीएल हंगामात कोलकाता संघाने रिंकूवर ५५ लाख रुपयांची बोली लावली होती. त्याने रविवारी केलेली खेळी ही आजवरच्या आयपीएल हंगामातील सर्वोत्कृष्ट खेळींपैकी एक खेळी ठरली. आजपर्यंत आयपीएलमध्ये अनेक करोडपती खेळाडूंनाही अशी कामगिरी करता आलेली नाही.
रिंकूचे वडील उत्तर प्रदेशातील अलिगढ येथून एलपीजी सिलिंडरची डिलिव्हरी करायचे. २०१५-१६ च्या हंगामात रिंकूची उत्तर प्रदेश अंडर-19 संघासाठी निवड झाली. यावेळी त्याच्या कुटुंबावर ५ लाख रुपयांचे कर्ज होते. हे कर्ज भागविण्यासाठी रिंकूने दैनंदिन भत्त्यातून बचत करण्यास सुरुवात केली. कर्ज भागविण्यासाठी झाडू मारण्याचे आणि पुसण्याचे कामही आई-वडिलांनी केले. या सर्व गोष्टींचे स्मरण करत रिंकू म्हणाला की, "माझ्या वडिलांनी खूप संघर्ष केला आहे. मी एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील आहे. रविवारी गुजरात विरुद्धच्या सामन्यात मी मैदानाबाहेर मारलेला प्रत्येक चेंडू त्यांना समर्पित होता ज्यांनी माझ्यासाठी खूप बलिदान दिले."
रिंकू याने संघाचे सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर यांच्यासोबत फलंदाजीवर खूप मेहनत घेतली. यामुळे तो रणजी ट्रॉफीमध्ये आश्वासक कामगिरी करु शकला. रणजी ट्रॉफीच्या २०२१-२२ हंगामात रिंकूने पाच सामन्यांमध्ये नऊ डावांत ५८.३३ च्या सरासरीने ३५३ धावा केल्या. यामध्ये चार अर्धशतकी खेळीचा समावेश होता. उत्तर प्रदेश संघातील सर्वाधिक धावा करणारा फलंदाजांमध्ये त्याचा समावेश होता. रणजीच्या यंदाच्या हंगामात रिंकूने सात सामन्यांतील ८ डावांमध्ये ६३.१४ च्या सरासरीने ४४२ धावा केल्या आहेत. यामध्ये दोन शतके आणि दोन अर्धशतकांचा समावेश आहे. गेल्या मोसमात तो उत्तर प्रदेशचा तिसरा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला होता.
हेही वाचा :