पुढारी ऑनलाईन डेस्क : Helicopter Crash : तामिळनाडूतील कुन्नूर वनक्षेत्रात बुधवारी (दि.८) दुपारी लष्कराचे 'एमआय १७व्ही ५' हे हेलिकॉप्टर कोसळले. यामध्ये चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल बिपीन रावत, त्यांच्या पत्नी मधुलिका तसेच लष्कराचे १२ अधिकारी होते. बिपीन रावत, मधुलिका रावत यांच्यासह १३ जणांचा मृत्यू झाला. ग्रुप कॅप्टन वरुण सिंह गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, देशात मागील काही वर्षांमध्ये अशा घटना घडल्या आहेत. यामध्ये माजी संरक्षण मंत्री शरद पवार यांच्या बाबतीतही अशी घटना घडली असत;, पण त्यांच्या प्रसंगावधानाने ही घटना कशी टळली. याबाबत आठवणींना त्यांनी उजाळा दिला आहे. पुणे ते मुंबई हेलिकॉप्टर प्रवासादरम्यान हा किस्सा घडल्याचे खासदार शदर पवार यांनी म्हटलं आहे.
शरद पवार म्हणाले की, देशातील लष्कर प्रमुख जी हवाई वाहतुकीसाठी संसाधने वापरली जातात त्यांचा दर्जा अतिशय उत्तम असतो. त्या वाहनांवर कोणतेही संकट येणार नाही, त्यांची पूर्ण खबरदारी घेऊन या वाहनांची रचना केली जाते; पण अशा हेलिकॉप्टरमधून अपघात होणे ही बाब दुर्देवाची असल्याचे पवार म्हणाले.
पवारांनी त्यांच्या बाबतीत घडलेल्या घटनेची माहिती देताना म्हटलं की, शरद पवार पुण्यातून मुंबईला हेलिकॉप्टरमधून जात होते. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी आणि एक राज्यमंत्री होते. लोणावळ्याच्या पुढे आल्यानंतर एका मोठ्या व्हॅलीमधून त्यांचे हेलिकॉप्टर प्रवास करत होते. या दरम्यान पायलट गोंधळलेल्या अवस्थेत होता. प्रवासादरम्यान त्यांचे हेलिकॉप्टर गर्द धुक्यात अडकले आणि सोसाट्याचा वारा येत होता. यामुळे हेलिकॉप्टर चालवण्यास मर्यादा येऊ लागल्या खोल दरी आणि मोठ्या डोंगरांमुळे हेलिकॉप्टर चालकाची भंबेरी उडाली होती. ही बाब शरद पवार यांच्या लक्षात येताच त्यांनी पायलटला काही सूचना केल्या.
शरद पवार यांना महाराष्ट्रातील भौगोलिक अभ्यासाची जाण असल्याने त्यांनी पायलटला हेलिकॉप्टर समुद्र सपाटीपासून ७ हजार फूट उंचीवर हेलिकॉप्टर वर घेण्यास सांगितले. या मागचे कारण म्हणजे, कळसुबाई शिखर. या शिखराची उंची ५ हजार ४०० फुटांपर्यंत आहे. याची माहिती पवारांना असल्याने त्यांनी हेलिकॉप्टर ७ हजार फुटांवर नेण्यास सांगितले.महाराष्ट्रात सर्वात उंच शिखर म्हणून कळसुबाईची ओळख आहे याचा हिशोब लावूनच त्यांनी हेलिकॉप्टरवर घेतल्याने त्यांच्या पुढे कोणताही अडथळासमोर येत नव्हता. वारा आणि धुके जरी असले तरी बाकीचा कोणता धोका नसल्याची खात्री पवारांनी पायलटला करून दिली होती.
जनरल बिपीन रावत यांचा हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झाल्यानंतर आतापर्यंत झालेल्या विमान आणि हेलिकॉप्टर्स अपघातांच्या घटनांचे पुन्हा एकदा स्मरण झाले आहे. आतापर्यंत वाय. एस. राजशेखर रेड्डी, संजय गांधी, माधवराव शिंदे, जी.एम.सी. बालयोगी, एस. मोहन, कुमारमंगलम, ओ.पी. जिंदल आणि अरुणाचल प्रदेशचे दोरजी खांडू या बड्या नेत्यांसह लेफ्टनंट जनरल दौलत सिंग यांचा हेलिकॉप्टर आणि विमान अपघातात मृत्यू झाला आहे.
हेही वाचलं का?