LPG New Rule Pudhari
अर्थभान

LPG New Rule: तुमचा सिलेंडर सरेंडर करा... तुम्हाला पण असा मेसेज आलाय का? LPGचे नियम बदलले

LPG New Rule: सरकारने ‘एक घर, एक गॅस कनेक्शन’ हा नवीन नियम लागू केला आहे. LPG आणि PNG दोन्ही कनेक्शन ठेवणे आता बेकायदेशीर असणार आहे.

पुढारी वृत्तसेवा

LPG New Rule: देशात एलपीजीबाबत एक महत्त्वाचा नियम लागू करण्यात आला असून अनेक ग्राहकांना यासंदर्भात मेसेजही येऊ लागले आहेत. मध्य पूर्वेतील तणाव आणि होर्मुज सामुद्रधुनीवरील (Hormuz Strait) परिणामामुळे जागतिक स्तरावर गॅस संकट निर्माण झाले आहे. त्याचा परिणाम भारतावरही झाला असून एलपीजीची टंचाई जाणवू लागली आहे.

या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने ‘एक घर, एक गॅस कनेक्शन’ हा नियम लागू केला आहे. म्हणजेच, एका घरात एकाच वेळी एलपीजी आणि पीएनजी (पाईप्ड नॅचरल गॅस) हे दोन्ही कनेक्शन ठेवणे आता नियमबाह्य असणार आहे. जर एखाद्या ग्राहकाकडे दोन्ही कनेक्शन असतील, तर त्यांना एलपीजी सिलेंडर सरेंडर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

काय आहे नवीन नियम?

नव्या नियमानुसार, ज्या घरांमध्ये पीएनजी कनेक्शन आहे, त्यांना एलपीजी सिलेंडर वापरण्याची किंवा रिफिल करण्याची परवानगी नाही. पेट्रोलियम मंत्रालयाने याबाबत गॅस कंपन्यांना स्पष्ट निर्देश दिले आहेत. त्यामुळे अशा ग्राहकांना एलपीजीचा पुरवठा थांबवला जाऊ शकतो.

मेसेजद्वारे दिला जातोय इशारा

गॅस कंपन्यांनी आपल्या ग्राहकांना याबाबत सतर्क करण्यासाठी मेसेज पाठवण्यास सुरुवात केली आहे. या मेसेजमध्ये ग्राहकांना सांगितले जात आहे की, जर त्यांच्या नावावर एलपीजी कनेक्शन असेल, तर त्यांनी त्याची स्थिती तपासून आवश्यक असल्यास तो सरेंडर करावा.

नियम न पाळल्यास काय होईल?

जर ग्राहकांनी हा नियम पाळला नाही, तर त्यांचे एलपीजी कनेक्शन थेट बंद केले जाऊ शकते. त्याचबरोबर दंडही आकारला जाऊ शकतो. त्यामुळे हा नियम गांभीर्याने घेणे आवश्यक आहे.

हजारो ग्राहकांनी आधीच सरेंडर केला सिलेंडर

या निर्णयाचा परिणाम दिसू लागला आहे. पीएनजी कनेक्शन असलेल्या सुमारे 40,000 पेक्षा जास्त ग्राहकांनी आपले एलपीजी कनेक्शन आधीच सरेंडर केले आहे. हा आकडा पुढे आणखी वाढण्याची शक्यता आहे.

होर्मुज संकटाचा परिणाम

अमेरिका-इराण तणावामुळे होर्मुज सामुद्रधुनीत अडथळे निर्माण झाले आहेत, ज्यामुळे जगातील जवळपास 20% तेल-गॅस पुरवठ्यावर परिणाम झाला. भारतासह अनेक देशांमध्ये यामुळे इंधन संकट निर्माण झाले आहे.

सरकारचे प्लॅन-B

या संकटाचा सामना करण्यासाठी सरकारने पर्यायी उपाययोजना सुरू केल्या आहेत. यात देशांतर्गत उत्पादन वाढवणे, आयात विविधीकरण आणि सिलेंडर वितरण व्यवस्थेत बदल करणे यांचा समावेश आहे.

एकूणच, एलपीजीचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आणि गरजूंपर्यंत पोहोचवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे ग्राहकांनी वेळेत योग्य पावले उचलणे आवश्यक आहे, अन्यथा आर्थिक दंड आणि सेवा बंद होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT