Pune Industrial Units Closure Pudhari
अर्थभान

Pune Job Crisis: पुण्यात पाच वर्षांत 6,433 उद्योग बंद; महाराष्ट्रात 36 हजारांहून अधिक कंपन्यांवर बंद होण्याची वेळ

Pune Industrial Units Closure: गेल्या पाच वर्षांत पुणे जिल्ह्यात 6,433 औद्योगिक युनिट्स बंद झाल्याची माहिती केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने दिली आहे.

Rahul Shelke

Pune Industrial Units Closure: पुणे जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांत तब्बल 6,433 औद्योगिक युनिट्स बंद झाल्याची माहिती समोर आली आहे. केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने शिवसेना (UBT) खासदार राजाभाऊ वाजे यांनी विचारलेल्या प्रश्नाला दिलेल्या लेखी उत्तरातून ही आकडेवारी समोर आली. महाराष्ट्रात याच कालावधीत 36,211 खासगी कंपन्या बंद, विसर्जित किंवा रजिस्टरमधून वगळण्यात आल्या, अशी माहिती मंत्रालयाने दिली आहे.

या आकडेवारीवरून राज्यातील उद्योगांच्या स्थितीवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. सरकारकडून महाराष्ट्रात मोठ्या गुंतवणुकीसाठी कोट्यवधी रुपयांचे सामंजस्य करार म्हणजेच MoU केले जात असल्याचे सांगितले जाते. मात्र दुसरीकडे आधीपासून राज्यात असलेले उद्योग मोठ्या संख्येने बंद होत असतील, तर या उद्योगांना टिकवण्यासाठी सरकार काय करत आहे, असा सवाल खासदार राजाभाऊ वाजे यांनी उपस्थित केला आहे.

मुंबईत सर्वाधिक उद्योग बंद

महाराष्ट्रातील प्रमुख औद्योगिक भागांमध्ये उद्योग बंद होण्याचे प्रमाण मोठे असल्याचे आकडेवारीतून दिसते. गेल्या पाच वर्षांत मुंबई शहरात 12,009 कंपन्या बंद झाल्या, तर ठाणे जिल्ह्यात 4,704 उद्योग बंद झाले. पुणे जिल्ह्यात बंद झालेल्या उद्योगांची संख्या 6,433 आहे.

पुणे, मुंबई आणि नाशिक यांसारख्या शहरांमध्ये उद्योगांसाठी चांगली पायाभूत सुविधा आणि मोठी बाजारपेठ उपलब्ध आहे. तरीही उद्योग बंद होत असल्याने त्यामागची नेमकी कारणे शोधण्याची गरज असल्याचे वाजे यांनी म्हटले आहे.

नवीन उद्योग आणण्याबरोबर जुने उद्योग टिकवणेही गरजेचे

सरकारकडून नवीन उद्योग आणि मोठ्या गुंतवणुकीला आकर्षित करण्यासाठी विविध MoU केले जातात. मात्र फक्त नवीन उद्योग आणण्यावर लक्ष केंद्रित न करता राज्यात आधीपासून सुरू असलेले उद्योग टिकवणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे वाजे यांनी सांगितले.

बंद पडलेल्या उद्योगांची जमीन अनेकदा अनेक वर्षे वापराविना पडून राहते. या जमिनीवर कर्ज, करार, न्यायालयीन वाद किंवा इतर कायदेशीर अडचणी असल्यामुळे नवीन उद्योग सुरू करण्यासाठी ती सहज उपलब्ध होत नाही. या अडचणी लवकर सोडवून बंद उद्योगांची जमीन नव्या उद्योगांसाठी उपलब्ध करून दिली पाहिजे, अशी मागणी वाजे यांनी केली आहे.

उद्योग बंद होण्यामागे नेमकी कारणे कोणती?

पुण्यातील उद्योग संघटनांच्या मते, उद्योग बंद होण्यामागे अनेक कारणे आहेत. त्यामध्ये पायाभूत सुविधांचा अभाव, आर्थिक अडचणी, खेळत्या भांडवलाची कमतरता आणि बँकांकडून कर्जाचे पुनर्गठन किंवा नवीन कर्ज मिळण्यात येणाऱ्या अडचणी यांचा समावेश आहे.

फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर यांनी पिंपरी-चिंचवडमधील पायाभूत सुविधांबाबत नाराजी व्यक्त केली. रस्ते, स्ट्रीट लाइट, ड्रेनेज आणि औद्योगिक कचरा व्यवस्थापन यांसारख्या मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचे त्यांनी सांगितले.

उद्योगांकडून मोठ्या प्रमाणात कर घेतला जात असताना त्याप्रमाणात पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जात नसल्याची तक्रारही त्यांनी केली.

काही कंपन्या महाराष्ट्राबाहेर गेल्या

उद्योग संघटनांच्या म्हणण्यानुसार, काही कंपन्यांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधून आपले उद्योग इतर भागात हलवले आहेत.

चाकणसह महाराष्ट्रातील इतर औद्योगिक भागांबरोबरच काही कंपन्या गुजरात आणि उत्तर प्रदेशातही स्थलांतरित झाल्या, कारण तिथे काही उद्योगांना महाराष्ट्रापेक्षा अधिक प्रोत्साहन आणि सवलती मिळत असल्याचे उद्योग प्रतिनिधींचे म्हणणे आहे.

काही कंपन्यांना कोरोना महामारीच्या काळात मोठा आर्थिक फटका बसला. त्यानंतर खेळते भांडवल कमी पडणे आणि बँकांकडून आवश्यक आर्थिक मदत न मिळणे यामुळे काही उद्योग बंद पडल्याचेही उद्योग संघटनांनी सांगितले.

पिंपरी-चिंचवडमधील कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न

पिंपरी-चिंचवडमधील लघुउद्योगांना औद्योगिक कचरा व्यवस्थापनाचीही अडचण असल्याचे उद्योग प्रतिनिधी सांगतात. पिंपरी-चिंचवड स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष संदीप बेलसरे यांच्या मते, काही औद्योगिक कचरा रांजणगावपर्यंत नेऊन टाकावा लागतो. त्यामुळे कचरा गोळा करणे आणि त्याची वाहतूक करणे यासाठी उद्योगांवर अतिरिक्त खर्चाचा भार पडतो. चाकण परिसरातही खराब रस्त्यांमुळे उद्योगांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले.

उद्योग बंद झाले म्हणजे रोजगारावरही परिणाम

या संपूर्ण प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे रोजगार. पुणे, पिंपरी-चिंचवड, चाकण आणि परिसरात मोठ्या प्रमाणावर लघु आणि मध्यम उद्योग आहेत. या उद्योगांमध्ये हजारो लोकांना रोजगार मिळतो. एखादा उद्योग बंद झाला किंवा दुसऱ्या राज्यात स्थलांतरित झाला, तर त्याचा थेट परिणाम कामगार आणि त्यांच्या कुटुंबांवर होतो.

खासदार राजाभाऊ वाजे यांनी मंत्रालयाकडे उद्योग बंद झाल्यामुळे किती कामगारांच्या रोजगारावर परिणाम झाला, याचीही माहिती मागितली होती. मात्र मंत्रालयाच्या उत्तरात या कामगारांच्या रोजगाराबाबत आकडेवारी देण्यात आली नसल्याचे त्यांनी सांगितले.

त्यामुळे केवळ किती कंपन्या बंद झाल्या यापेक्षा त्यामुळे किती रोजगार गेले आणि किती कुटुंबांवर परिणाम झाला, हे समजणेही तितकेच महत्त्वाचे आहे.

सरकारसमोर मोठे आव्हान

महाराष्ट्र हे देशातील प्रमुख औद्योगिक राज्यांपैकी एक आहे. मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि इतर भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर उद्योग आहेत.

मात्र एका बाजूला नवीन गुंतवणूक आणण्याचे प्रयत्न सुरू असताना दुसऱ्या बाजूला विद्यमान उद्योग बंद होत असतील, तर या परिस्थितीचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.

उद्योगांना चांगले रस्ते, पाणी, वीज, कचरा व्यवस्थापन, वाहतूक व्यवस्था आणि इतर मूलभूत सुविधा मिळणे आवश्यक आहे. त्याचबरोबर आर्थिक अडचणीत असलेल्या उद्योगांना आवश्यक मदत आणि योग्य धोरणात्मक प्रोत्साहन मिळणेही महत्त्वाचे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT