People Talking Less: आजच्या डिजिटल युगात माणसांमधील संवाद अधिक सोपा आणि वेगवान झाला असला, तरी आपण पूर्वीपेक्षा कमी बोलत आहोत, अशी धक्कादायक बाब एका नव्या अभ्यासातून समोर आली आहे. विशेषतः तरुणांमध्ये बोलण्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी झाले आहे. यामुळे भविष्यात त्याचा सामाजिक जीवनासोबतच मेंदूच्या कार्यक्षमतेवरही परिणाम होऊ शकतो का, याबाबत वैज्ञानिकांमध्ये चर्चा सुरू झाली आहे.
सोशल मीडियावर सध्या ‘Gen Z Stare’ हा प्रकार चांगलाच चर्चेत आहे. एखाद्याशी बोलताना उत्तर देण्याऐवजी निर्विकार चेहऱ्याने पाहणे, कमीत कमी शब्दांत प्रतिक्रिया देणे किंवा केवळ हाताने इशारा करणे, अशा प्रकाराला ‘Gen Z Stare’ नावाने संबोधले जाते.
जुलैमध्ये Perspectives on Psychological Science या नियतकालिकात प्रकाशित झालेल्या अभ्यासात 2,000 हून अधिक लोकांच्या डेटाचे विश्लेषण करण्यात आले. या अभ्यासानुसार, अमेरिका आणि इतर काही देशांमधील लोक दरवर्षी सरासरी सुमारे 300 शब्द कमी बोलत आहेत.
हे प्रमाण साधारण दोन ते तीन मिनिटांच्या संभाषणाइतके आहे. 2005 ते 2019 या कालावधीत बोलण्याचे प्रमाण तब्बल 28 टक्क्यांनी कमी झाले, असे अभ्यासात आढळले.
या बदलामागे स्मार्टफोन, टेक्स्ट मेसेजिंग, ई-मेल, रिमोट वर्क आणि दैनंदिन व्यवहारातील वाढते डिजिटल पर्याय यांचा मोठा वाटा असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या अभ्यासाच्या प्रमुख लेखिका आणि युनिव्हर्सिटी ऑफ मिसुरी-कॅन्सस सिटी येथील मानसशास्त्र व समुपदेशनाच्या सहाय्यक प्राध्यापक व्हॅलेरिया फायफर या सुरुवातीला लिंगानुसार बोलण्याच्या पद्धतींचा अभ्यास करत होत्या.
डेटा तपासताना त्यांना एक वेगळीच बाब जाणवली ती म्हणजे लोकांचे बोलणे कमी होत आहे. त्यानंतर त्यांनी हा ट्रेंड अधिक बारकाईने तपासला. तब्बल 14 वर्षांचा डेटा पाहिल्यानंतर या बदलाचे प्रमाण किती मोठे आहे, हे स्पष्ट झाले. फायफर यांच्या मते, हा बदल केवळ आकडेवारी नसून भविष्यातील सामाजिक आणि मानसिक परिणामांचा संकेत असू शकतो.
मानवी इतिहासात बोलणे हा संवादाचा सर्वात महत्त्वाचा मार्ग होता. दुकानात खरेदी करणे, एखाद्याला रस्ता विचारणे, अनोळखी व्यक्तीशी ओळख करणे, सहकाऱ्यांसोबत काम करणे किंवा मैत्री टिकवणे, या सर्वांसाठी प्रत्यक्ष संवाद आवश्यक होता. मात्र, आता परिस्थिती बदलली आहे.
खरेदीसाठी सेल्फ-सर्व्हिस किऑस्क, एखाद्या ठिकाणी जाण्यासाठी Google Maps, संवादासाठी टेक्स्ट मेसेज आणि प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी AI चॅटबॉट्स उपलब्ध आहेत. परिणामी, पूर्वी ज्या छोट्या-छोट्या गोष्टींसाठी दुसऱ्या व्यक्तीशी बोलावे लागत होते, त्या आता काही सेकंदांत डिजिटल पद्धतीने पूर्ण होतात.
बोलणे ही साधी क्रिया वाटत असली तरी प्रत्यक्षात त्यासाठी मेंदूला अनेक प्रक्रिया एकाच वेळी पार पाडाव्या लागतात. एखादे साधे वाक्य बोलतानाही मेंदूला योग्य शब्द आठवावे लागतात, वाक्याची रचना करावी लागते, समोरच्या व्यक्तीची प्रतिक्रिया समजून घ्यावी लागते आणि त्यानुसार पुढील उत्तर तयार करावे लागते.
मेंदूतील Broca’s area सारखे भाग भाषण निर्मिती आणि उच्चार प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे संशोधकांसमोर एक महत्त्वाचा प्रश्न आहे, जर संभाषणामुळे मेंदूतील या प्रक्रिया सातत्याने सक्रिय राहत असतील, तर कमी बोलण्याचा दीर्घकाळात काही परिणाम होऊ शकतो का?
याचे निश्चित उत्तर अद्याप मिळालेले नाही. कमी बोलल्यामुळे थेट डिमेन्शिया किंवा इतर मेंदूचे आजार होतात, असा कोणताही पुरावा या अभ्यासातून मिळत नाही.
बोलणे कमी होण्यासोबतच लोक एकमेकांना कमी भेटत आहेत. सामाजिक संबंध आणि मानसिक उत्तेजना चांगल्या आरोग्याशी संबंधित असल्याचे यापूर्वीच्या अनेक संशोधनांत दिसून आले आहे.
हार्वर्डचे राजकीय शास्त्रज्ञ रॉबर्ट पुटनॅम यांनी अमेरिकेत प्रत्यक्ष सामाजिक सहभाग कमी होत असल्याचे यापूर्वीच सांगितले होते. क्लब, चर्च, स्थानिक संस्था आणि सामुदायिक उपक्रमांपासून लोक दूर जाण्याची प्रक्रिया स्मार्टफोनच्या आगमनापूर्वीच सुरू झाली होती. डिजिटलमुळे या प्रक्रियेला आणखी वेग मिळत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले होते.
तरुण पिढीमध्ये हा बदल अधिक जाणवतो. कोविड-19 दरम्यान अनेक तरुणांचे शालेय आणि सामाजिक जीवन ऑनलाइन झाले. त्यामुळे त्यांच्या महत्त्वाच्या सामाजिक विकासाच्या काळात प्रत्यक्ष संवाद कमी झाला.
टेक्स्ट मेसेजमध्ये उत्तर देण्यापूर्वी विचार करता येतो, संदेश पुन्हा लिहिता येतो आणि आधीचे संभाषण स्क्रीनवर उपलब्ध असते. त्यामुळे मेंदूवर तात्काळ प्रतिक्रिया देण्याचा दबाव कमी होतो.
मात्र, प्रत्यक्ष संभाषणात समोरची व्यक्ती काय म्हणाली, त्याचा अर्थ काय आहे, आपण काय उत्तर द्यायचे आणि समोरच्या व्यक्तीची पुढील प्रतिक्रिया काय असेल, या सर्व गोष्टींचा एकाच वेळी विचार करावा लागतो.
यामुळे प्रत्यक्ष संभाषण हे लक्ष, स्मरणशक्ती आणि कार्यरत स्मरणशक्ती (working memory) यांना अधिक सक्रिय ठेवणारे असू शकते, असा संशोधकांचा अंदाज आहे.
संशोधक व्हॅलेरिया फायफर यांच्या मते, फक्त कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांसोबतचे संभाषणच महत्त्वाचे नाही. अनोळखी व्यक्तींशी होणाऱ्या छोट्या-छोट्या गप्पाही सामाजिक कौशल्यांसाठी उपयुक्त असतात.
उदाहरणार्थ, टॅक्सी चालकाला हवामानाबद्दल विचारणे, विमानातील सहप्रवाशाशी एखाद्या वस्तूबद्दल बोलणे किंवा कॉफी शॉपमध्ये पेयाबाबत चर्चा करणे, या अगदी साध्या वाटणाऱ्या संवादांमुळेही लोकांना ऐकणे, उत्तर देणे, प्रतिक्रिया समजून घेणे आणि सामाजिक आत्मविश्वास वाढवणे याचा सराव होतो.
डिजिटल पर्यायामुळे आपण केवळ काही शब्द वाचवतो, त्यामुळे संवादाची गरज उरत नाही, मेसेजमुळे फोन करण्याची गरज राहत नाही आणि AI मुळे एखाद्या प्रश्नाचे उत्तर दुसऱ्या व्यक्तीला विचारण्याची गरजही भासत नाही.
एका-दोन प्रसंगांकडे पाहिल्यास यात काही नुकसान दिसत नाही. मात्र, अशा हजारो छोट्या संवादांची बेरीज झाली तर त्याचा सामाजिक आणि संज्ञानात्मक परिणाम काय होईल? हा आता संशोधकांसमोरचा महत्त्वाचा प्रश्न आहे.
त्यामुळे पुढच्या वेळी दुकानात, लिफ्टमध्ये, प्रवासात किंवा कॉफी शॉपमध्ये एखाद्या अनोळखी व्यक्तीशी दोन शब्द बोलण्याची संधी मिळाली, तर ती टाळण्याऐवजी संवाद साधणे कदाचित आपल्या सामाजिक आणि मानसिक आरोग्यासाठीही फायदेशीर ठरू शकते.