तुम्ही जेवण किती वेळात संपवता यावर तुमच्या आरोग्याची खूप मोठी गोष्ट अवलंबून असते. अनेकदा आपण घाईघाईत जेवण करतो, पण हे शरीरासाठी हानिकारक ठरू शकतं. तुम्ही पण तुमचे जेवण फक्त 10–15 मिनिटात उरकता का? तर मग थांबा !, कारण ही सवय आरोग्याच्या दृष्टीने खूपच घातक आहे.
यावरून तुम्हाला प्रश्न पडला असेल की, मग जेवण नेमकं किती वेळेत केले पाहिजे?, जेवण करण्यासाठी लागणारा आयडीयल टाईम (ideal time) काय असावा?, जेवणासाठी किमान २० मिनिटे कि ३० मिनिटांपेक्षा जास्त वेळ देणे महत्त्वाचे आहे? चला तर तुमच्या मनातील सर्व प्रश्नाची उत्तरे समजून घेऊया...
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, "दररोज जेवण करण्यासाठी २० मिनिटं ही किमान गरज आहे. जेवणासाठी ३० मिनिटं किंवा अधिक वेळ दिला तर हे आरोग्य, पचन आणि मानसिक शांततेसाठी उत्तम आहे. जेवण म्हणजे एक माइंडफुल (mindful) कृती असावी, घाईघाईची सवय नव्हे. फास्ट (Fast) खाणं म्हणजे मेजवानी (Feast) नाही, तर भविष्यातील समस्या (Future problems) असेही तज्ज्ञ म्हणतात.
अति खाणे टळते: आपला मेंदू 'पोट भरले' आहे हा सिग्नल देण्यासाठी सुमारे २० मिनिटे घेतो. तुम्ही त्याआधीच जेवण संपवल्यास, तुम्हाला पोट भरल्याची जाणीव होत नाही आणि तुम्ही जास्त खाऊ शकता, ज्यामुळे वजन वाढू शकते.
पचन सुधारते: हळू खाल्ल्याने पचनक्रिया चांगली होते आणि ऍसिडिटी तसेच पोट फुगणे यांसारख्या समस्या टाळता येतात.
मधुमेहींसाठी महत्त्वाचे: मधुमेहाच्या रुग्णांनी हळू जेवणे आवश्यक आहे, कारण त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी (sugar spikes) अचानक वाढत नाही.
आरोग्यावर सकारात्मक परिणाम : सावकाश जेवल्याने हृदय, यकृत आणि मानसिक शांततेवर सकारात्मक परिणाम होतो.
"स-अवकाश जेवण" म्हणजे फक्त हळू खाणे नाही, तर शिस्तीने, शांतपणे, लक्षपूर्वक आणि कृतज्ञतेने जेवणे. 'पोटभर जेवणे' चांगले वाटत असले तरी, 'सावकाश जेवणे' हे तुमच्या हृदयासाठी, मेंदूसाठी आणि पचनासाठी अधिक उत्तम आहे. तुमची जेवण करण्याची सवय बदलली तर तुमचे आयुष्य नक्कीच बदलू शकते. ही चांगली सवय इतरांपर्यंत पोहोचवणे हीच खरी मदत आहे. थोडं खाल्लं, पण नीट पचवलं” हेच खरे जीवन औषध ( Lifestyle Medicine) आहे, असे मत देखील आरोग्य तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.