file photo 
Latest

Congress : देशभरातील ईडी कार्यालयासमोर काँग्रेसचे आज धरणे आंदोलन

अविनाश सुतार

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : केंद्रातील भाजपा सरकारने सोनिया गांधी व राहुल गांधी यांना नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी 'ईडी'ची नोटीस ही राजकीय द्वेषातून पाठवलेली आहे. या प्रकरणात एका पैशाचाही गैरव्यवहार झालेला नाही. नॅशनल हेरॉल्डशी संबंधित कोणत्याही संचालकाला लाभांश अथवा पैसे मिळालेले नाहीत. २०१५ साली बंद झालेले हे प्रकरण पुन्हा उकरून काढण्यामागे केवळ गांधी कुटुंबाला नाहक त्रास देण्याचा प्रकार आहे. परंतु, काँग्रेस पक्ष भाजपा सरकारच्या या दडपशाहीसमोर झुकणार नाही. भाजपाच्या या दडपशाहीविरोधात काँग्रेस (Congress) आज ( दि. मुंबई 13 ) आणि नागपूर येथील ईडी कार्यालयासमोर आंदोलन करणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी दिली.

(Congress) गांधी भवन येथे पत्रकारांशी संवाद साधताना अतुल लोंढे म्हणाले की, नॅशनल हेराल्ड वर्तमानपत्राची स्थापना १९३७ साली पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, पुरुषोत्तम टंडन, आचार्य नरेंद्र देव, रफी अहमद किडवई या नेत्यांनी केली हाेती. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत नॅशनल हेराल्ड वर्तमानपत्राने मोलाची भूमिका बजावत देशाची सेवा केली. इंग्रज सरकारने या वृत्तपत्रावर १९४२ ते १९४५ दरम्यान बंदी घातली होती. स्वातंत्र्यानंतरही लोकशाही, संविधान व काँग्रेसचा विचार पुढे चालू ठेवण्यासाठी हे वर्तमानपत्र तोट्यात असतानाही चालूच ठेवले होते. या वर्तमानपत्रातील पत्रकार, कर्मचारी यांचा पगार देता यावा, यासाठी काँग्रेस पक्षाने नॅशनल हेराल्डला २००२ ते २०११ दरम्यान ९० कोटी रुपये १०० हप्त्यात कर्जाने दिले. अशा प्रकारे कर्ज देणे कोणत्याही कायद्याखाली बेकायदेशीर नाही. हा सर्व व्यवहार पूर्णपणे पारदर्शक आहे. यात कसल्याही प्रकारच्या चल-अचल संपत्तीचे हस्तांतरण झालेले नाही व कोणालाही लाभ झालेला नसताना मनी लाँडरिंगचा गुन्हा कसा होतो ?, असा सवालही त्‍यांनी केला.

९० कोटींचे हे कर्ज नॅशनल हेराल्डला परत करणे शक्य नसल्याने असोशिएटेड जनरल लिमिटेडने ते इक्विटी शेअरमध्ये परावर्तित केले. हे शेअर 'यंग इंडिया' या 'नॉट फॉर प्रॉफिट' कंपनीला कलम २५ अंतर्गत हस्तांतरित करण्यात आले. त्यावेळी सोनिया गांधी, राहुल गांधी, स्व. ऑस्कर फर्नांडिस, स्व. मोतीलाल व्होरा, सुमन दुबे हे या कंपनीचे व्यवस्थापकीय सदस्य हाेते. त्‍यांना कोणत्याही प्रकारचा लाभांश मिळालेला नाही. हे सर्व सूर्यप्रकाशासारखे स्वच्छ असताना केवळ राजकीय द्वेषातून ही कारवाई केली जात आहे.

केंद्रातील भाजपाचे सरकार, महागाई, पेट्रोल, डिझेलचे वाढते दर, रुपयाची घसरण, अर्थव्यवस्थेची घसरगुंडी, काश्मीर पंडितांची हत्या व पलायन या मुख्य मुद्यांवरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी असे मुद्दे उकरून काढत आहे, असा आराेपही त्‍यांनी केला.

गांधी कुटुंबाची भाजपा नेहमीच बदनामी करत आला आहे. इंदिरा गांधी, सोनिया गांधी, राहुल गांधी यांना सातत्याने बदनाम करण्याचे काम केले आहे. नेहरु-गांधी कुटुंबाने स्वतःची संपत्ती देशाला दान दिली, या कुटुंबाने देशासाठी बलिदान दिले; पण त्या कुटुंबाला नाहक त्रास देण्याच्या भाजपाच्या मोहिमेचाच हा एक भाग आहे. भाजपाच्या या हुकूमशाहीसमोर काँग्रेस पक्ष कधीही झुकणार नाही. सोमवारी (दि. १३) देशभर ईडीच्या कार्यालयासमोर आंदोलन करून या कारवाईचा तीव्र निषेध केला जाईल. मुंबईत उद्या दुपारी १२ वाजता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते ईडी कार्यालय, असा मोर्चा काढला जाणार आहे, असेही लोंढे यांनी सांगितले.

हेही वाचलंत का ? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT