मंत्री पदाच्या पाच वर्षात प्रॉपर्टी विकून जिल्हा चालविला : मंत्री दीपक केसरकर | पुढारी

मंत्री पदाच्या पाच वर्षात प्रॉपर्टी विकून जिल्हा चालविला : मंत्री दीपक केसरकर

सावंतवाडी; पुढारी वृत्तसेवा : आम्हाला हे गद्दार म्हणत आहेत. पण खरे गद्दार हे आहेत. कारण यांनी महाराष्ट्राच्या जनतेचा विश्वासघात केला आहे. अहो यांना पाहिजे त्यावेळी पैसे आम्ही पुरविले. मंत्री पदाच्या पाच वर्षात सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सगळा खर्च मी माझ्या प्रॉपर्टी विकून केलेला आहे. मग यांना आम्हाला गद्दार म्हणण्याचा काय अधिकार आहे? असा थेट सवाल राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सावंतवाडी येथे बोलताना केला.

आम्ही जनतेने दिलेल्या निर्णयाच्या बाजून उभे राहिलो आहोत. खोक्याचा अर्थ काय? आम्ही काय पैसे घेवून कुठे गेलोय. असा जोरदार प्रहार शिवसेना (शिंदे गट) प्रवक्ते तथा शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी थेट मातोश्रीवर हल्लाबोल केला आहे. सावंतवाडी येथील रवींद्र मंगल कार्यालयात बाळासाहेबांची शिवसेना मेळाव्यात ते बोलत होते.

यावेळी बाळासाहेबांच्या शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख आणि आमदार रवींद्र फाटक यांचे स्वागत करण्यात आले यावेळी झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

पुढे बोलताना केसरकर यांनी, महाविकास आघाडी बनली. ती कोणाला पटली नाही. महाराष्ट्राच्या जनतेशी गद्दारी केली गेली होती. चुकीच्या पद्धतीने हे सर्व करण्यात आले, असे सांगताना मंत्री केसरकर यांनी, केलेल्या उपकाराची जाणिव नसलेली माणसे सत्तेवर होती. ती कोणाला विचारत नव्हती. मी काजू धोरण सादर केले. त्याला अन्य मंत्री मान्यता देण्यास सांगायचे. पण आमचे तत्कालीन मुख्यमंत्री हसायचे. त्यांना काजू धोरण म्हणजे काय ? माहित नव्हते. काजूचे झाड, काजूची बी, काजूचे बोंड म्हणजे काय माहित नाही. माझे साडेचारशे कोटी अजित पवार यांनी काढून घेतले. त्यावेळी आदित्य ठाकरे हसत होते. त्याचा व्हिडिओ पूर्ण कोकणात दाखविला पाहिजे. कोकण कधीही अवहेलना सहन करणार नाही, असेही केसरकर यांनी यावेळी आरोप केले.

शिवसेनेतून बाहेर पडलेला निवडून येत नाही म्हणून काय सांगता. नारायण राणे बाहेर पडले त्यावेळी त्यांच्यासोबत १२ आमदार गेले होते. त्यावेळी नारायण राणे व अकरा आमदार निवडून आले. दुसऱ्या माणसाचा आदर ठेवण्याची कोकणी संस्कृती आहे. म्हणून आम्ही तुमचा आदर ठेवत आहोत. परंतु, तुम्ही सारखे आरोप करीत राहिलात तर आम्हाला सुद्धा तसेच वागावे लागेल, असा शेवटी इशारा केसरकर यांनी दिला.

पुढे बोलताना मंत्री केसरकर यांनी, आजचा बदल महाराष्ट्राच्या हिताचा आहे. जगामध्ये कुठेही गेलात तरी गवगवा पंतप्रधान मोदी यांचा आहे. रशिया युक्रेन यांचे युद्ध चालू आहे. यावर अमेरिकेचे राष्ट्रपती म्हणतात मोदी यांनी पुढाकार घेवून युद्ध संपवावे. एवढा मोठा नेता ज्या देशाचा असतो. त्या देशाचा तो अभिमान असतो. आम्हाला सुद्धा आमच्या पंतप्रधान मोदी यांचा अभिमान आहे. मोदी यांनी चांगले काम करायचे. मात्र, संजय राऊत यांनी त्यांच्या विरोधात रोज काहीतरी लिहायचे, हे कोणालाच आवडले नव्हते, असेही केसरकर म्हणाले.

अधिक वाचा :

Back to top button