

पंढरपूर : पुढारी वृत्तसेवा आषाढी वारीनिमित्त पंढरपूर येथे पांडुरंगाच्या दर्शनासाठी बुलढाणा जिल्ह्यातून बालाजी (वय १८ वर्षे) हा तरुण वारकरी आलेला. गुरुवारी सायंकाळी पाचच्या सुमारास पुंडलिक मंदिरासमोर चंद्रभागा नदीत स्नानासाठी गेला. पोहत नदीपात्रात दूरपर्यंत गेला. परंतु त्याला दम लागल्यामुळे तो पाण्यात बुडू लागला. त्यावेळी नदीपात्रात गस्त घालणाऱ्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या वजीर पथकातील बचाव दलाने त्या तरुण भाविकाचा जीव वाचवून त्याला जीवनदान दिले, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी शमा पवार यांनी दिली.
ही घटना गुरुवारी सायंकाळी पाचच्या सुमारास सुमारास घडली. यावेळी बचाव दलाने बालाजी या तरुणास जीवनदान दिले. परंतु तो अत्यंत घाबरलेला होता त्यामुळे त्याला स्वतःचा व्यवस्थित परिचय करून देता आला नाही.
आषाढी वारीसाठी प्रतीवर्षी 12-14 लाखांपेक्षा अधिक भाविक पंढरपूर येथे येत असतात. कोविड मुळे मागील दोन वर्षे आषाढी वारी यात्रा झालेली नाही, त्यामुळे यावर्षी पंढरपूर येथे मागील वर्षीच्या तुलनेत 20 ते 25 टक्के भाविक अधिक येण्याची शक्यता आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण मार्फत विविध बचाव पथके नदीतीरावर व नदीपात्रात सतर्क ठेवण्यात आलेले आहेत. तरीही कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रत्येक भाविकांनी व त्यांच्या सोबत असलेल्या इतर भाविकांनी स्वतःहून काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
हेही वाचलंत का?