

उज्जैन : सध्या कलियुगात, एकीकडे अनेक निर्दयी मुलं आपल्या आई-वडिलांची वृद्धाश्रमात रवानगी करीत असताना दुसरीकडे आई-वडिलांसाठी थक्क करणार्या गोष्टी करणारीही मुलं आहेत. उज्जैनमध्येही असाच कलियुगातील श्रावणबाळ आहे. या तरुणाचे नाव आहे रौनक गुर्जर. त्याने आपल्या आईसाठी चक्क आपल्या जांघेवरील कातडी काढून चप्पल बनवले आहे!
ढांचा भवन क्षेत्राजवळ राहणारे रौनक हे रोज रामायणाचा पाठ करतात. एक दिवस रामायण वाचत असताना त्यांनी संकल्प केला, की ते आपल्या कातडीपासून आईसाठी चप्पल बनवतील. अर्थात हा संकल्प त्यांनी मनातच केला होता व त्याबाबत कुणालाही कळू दिले नाही. काही दिवसांपूर्वी त्यांनी शस्त्रक्रिया करवून आपल्या जांघेवरील कातडी काढून घेतली. या कातडीचा वापर करून त्यांनी आईसाठी चप्पल बनवली आणि आता ती समारंभपूर्वक आपल्या आईच्या पायात घातली. हे पाहून त्या माऊलीला काय वाटले असेल, याची आपण कल्पना करू शकतो! त्यांची अवस्था 'अश्रुनीर वाहे डोळा' अशी झाली. तिथे उपस्थित असलेल्या लोकांच्याही डोळ्यांमधून अश्रू वाहू लागले. निरुला गुर्जर नावाची ही माऊली आपल्या सुपुत्राला कवेत घेऊन अश्रू ढाळू लागली व लोकही भावविभोर होऊन गेले!