येथे प्राणीही घेतात आठवड्याची सुट्टी! | पुढारी

येथे प्राणीही घेतात आठवड्याची सुट्टी!

रांची : जर तुम्हाला सोमवार हा आठवड्याचा पहिला दिवस प्रेरणा देत नसेल, तर तुम्ही चुकीची नोकरी करत आहात, अशा आशयाचे एक इंग्रजी सुभाषित अतिशय लोकप्रिय आहे. काही सोशल नेटवर्कवर तर मंडे मोटिव्हेशन नावाचे हॅशटॅगदेखील आहेत. आता सुट्ट्याही वेगवेगळ्या असतात. काहींना आठवड्यातून अगदी दोन दिवसही सुट्टी असते, तर काहींना एकाच दिवसाच्या सुट्टीवर समाधान मानावे लागते. अर्थातच, सुट्टी एका दिवसाची असो किंवा दोन दिवसांची, नोकरीतील जवळपास प्रत्येक जण आठवडाभर या सुट्टीची प्रतीक्षा करत असतोच असतो. आता जसे नोकरदाराला सुट्टी हवीहवीशी वाटते, तसे प्राण्यांनी सुट्टी घेतली तर? क्षणभर हा प्रश्न थक्क करायला लावेल; पण भारतात एक ठिकाण असेही आहे, जेथे मनुष्याप्रमाणे चक्क प्राण्यांनाही आठवड्यातून एका दिवसाची सुट्टी दिली जाते. त्या दिवशी त्यांना फक्त आराम करायचा असतो.

झारखंडमधील लातहर नावाचे एक खेडे असून, तेथे सर्वप्रथम प्राण्यांना सुट्टी देण्याची परंपरा सुरू झाली. झारखंडच्या लातेहार गावाने याचा अवलंब केल्यानंतर लगोलग आसपासच्या खेड्यांनीही त्याचे अनुकरण केले. नंतर जवळच्या हर्खा, मुंगर, लालगडी आणि पक्रर गावातही ही प्रथा सुरू करण्यात आली आणि येथे सर्व प्राण्यांना एका दिवसाची सुट्टी दिली जाते.

या सर्व प्राण्यांना आठवड्यातून एक दिवस विश्रांती देण्यामागे त्यांना पुरेसा आराम मिळावा, असा आहे. गाय, म्हैस, बैल असे प्राणी माणसांना त्यांच्या कामात मदत करतात, उत्पन्न मिळवून देतात. कित्येकांच्या उत्पन्नांचं साधनच हे प्राणी आहेत. त्यामुळे असं ठिकाण जिथं या प्राण्यांना रविवारी आराम दिला जातो. त्यांच्याकडून कोणतंच काम करवून घेतलं जात नाही. यामागे खरं तर एक कारण आहे. दहा दशकांपूर्वी शेतात काम करताना एका बैलाचा मृत्यू झाला होता. यानंतर ग्रामस्थांनी प्राण्यांनाही आठवड्यातून एकदा विश्रांती देण्याचे ठरवले. त्यावेळेपासून आजपर्यंत ही परंपरा अव्याहतपणे पाळली जात आहे.

Back to top button