आनंदाश्रू का व कसे येतात हे तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कारण | पुढारी

आनंदाश्रू का व कसे येतात हे तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कारण

न्यूयॉर्क :  माणूस दुःखातच अश्रू ढाळतो असे नाही, त्याला आनंदाच्या आवेगातही डोळ्यात पाणी येते. आपण त्याला ‘आनंदाश्रू’ असे म्हणत असतो. हे आनंदाश्रू का व कसे येतात हे तुम्हाला माहिती आहे का? त्यापाठीमागेही एक विज्ञान दडलेले आहे!

डोळ्यांत पाणी येण्याची दोन कारणे असतात. यामधील पहिले कारण म्हणजे ज्यावेळी आपण खळखळून हसतो त्यावेळी आपल्या चेहर्‍याच्या पेशी अमर्याद काम करू लागतात. तसे घडताच आपल्या अश्रू ग्रंथींवरील मेंदूचे नियंत्रण सुटते आणि डोळे पाणावतात. दुसरे कारण म्हणजे जोरात हसल्यामुळेही व्यक्ती भावनिक होते. त्यामुळे चेहर्‍याच्या पेशींवर वाढीव दबाव येतो. त्यामुळे डोळ्यांमधून अश्रू ओघळतात. अश्रूंवाटे आपलं शरीर तणावात संतुलन साधण्याचा प्रयत्न करीत असते. कमी अथवा जास्त भावनिक होण्यामागे शरीरातील हार्मोन्सची मोलाची भूमिका असते.

हसण्यामुळे मेंदूचा जो भाग सक्रिय होतो तोच भाग रडतानाही सक्रिय होतो. सतत हसण्या-रडण्यामुळे मेंदूतील पेशींवर अधिक तणाव येतो. अशातच शरीरातील कार्टिसोल आणि एड्रिनालाईन नावाचे हार्मोन्स स्रवतात. हेच हार्मोन्स हसताना किंवा रडताना शरीरात होणार्‍या प्रतिक्रियेसाठीही जबाबदार ठरतात. विशेष म्हणजे आनंदात असताना पहिला अश्रू उजव्या डोळ्यातून येतो, तर दुःखी असताना पहिला अश्रू डाव्या डोळ्यातून ओघळतो!

Back to top button