पुढारी ऑनलाईन डेस्क : आशिया चषक स्पर्धेत रविवारी रात्री भारताने पाकिस्तानचा ५ गडी राखून पराभव केला. नाणेफेक हारल्यानंतर पाकिस्तानने 147 धावा स्कोअरबोर्डवर लावल्या, ही धावसंख्या भारताने शेवटच्या षटकात गाठली. भारतीय संघाच्या या कामगिरीचे सर्वजण कौतुक करत आहेत. अनेक माजी पाकिस्तानी क्रिकेटपटूंनीही टीम इंडियाचे कौतुक केले आहे. मोईन खान, इक्बाल कासिम, कामरान अकमल, आकिब जावेद आणि जावेद मियांदाद यांनी त्यांचे मनापासून कौतुक केले. पण, पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीनं गंभीरबाबत वादग्रस्त विधान केले आहे.
गेल्या काही वर्षात भारताविरुद्ध वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या शाहिद आफ्रिदी पुन्हा गंभीरबाबत वादग्रस्त विधान करताना दिसला आहे.
भारत-पाकिस्तान सामन्याबाबतच्या 'आज तक' वाहिनीवरील चर्चासत्रात हरभजन सिंग आणि शाहिद आफ्रिदी सहभागी झाले होते. यात शाहिद आफ्रिदीने गंभीरबाबत वादग्रस्त विधान केलं.
काय आहे प्रकरण
भारत-पाकिस्तान सामन्याबाबतच्या 'आज तक' वाहिनीवरील चर्चासत्रात हरभजन सिंग आणि शाहिद आफ्रिदी सहभागी झाले होते. या चर्चासत्रात शाहिद आफ्रिदीने गंभीरबाबत वादग्रस्त विधान केले. तो म्हणाला की, भारतीय संघातील खेळाडूंशी माझे वैयक्तिक पातळीवर कधीच भांडण झालेलं नाही. मला आजही भारतातून अनेक खेळाडूंचे मेसेज येतात. कुणासोबत माझे वैयक्तीक भांडण झालले नाही.
सोशल मीडियावर गौतम गंभीरसोबत कधी-कधी काही वाद होतात, पण मला वाटतं गौतमचं पात्र असं आहे की भारतीय संघातील खेळाडूनी सुद्धा त्याला कधी पसंत केले नाही, असे आफ्रिदी म्हणाला.
या त्याच्या वाक्यानंतर एकच हशा पिकला. अगदी हरभजन सिंग देखील आफ्रिदीच्या विधानावर स्मितहास्य करताना दिसला. आफ्रिदीच्या विधानावर हरभजननं अशा पद्धतीनं व्यक्त होणं नेटिझन्सला पटलेलं नाही. भारतीय चाहत्यांनी हरभजनच्या कृतीबाबत नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली.
यानंतर गौतम गंभीरकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही, परंतु गंभीर देखील गप्प बसणारा नाही. आज ना उद्या तो नक्कीच आफ्रिदीला चोख प्रत्युत्तर देईल.