![आयपीएल-2022 चा विजेता कोण?](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2022%2F05%2F7-31-5.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
अहमदाबाद; वृत्तसंस्था : आयपीएलचे विजेतेपद मिळवण्यासाठी गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात आज (29 मे) लढत होणार आहे. 15 वर्षांपूर्वी आयपीएलच्या पहिल्या हंगामाचे विजेतेपद मिळवणार्या राजस्थान रॉयल्सला पुन्हा एकदा इतिहास घडवण्याची संधी आहे. दुसर्या बाजूला दिग्गजांचा पराभव करत प्रथमच लीगमध्ये खेळणार्या गुजरात टायटन्सला नवा इतिहास घडवण्याची संधी आहे. दोन महिन्यांपूर्वी आयपीएलचा 15वा हंगाम सुरू झाला तेव्हा कोणी विचारदेखील केला नसेल की अंतिम सामन्यात नाणेफेकीसाठी संजू सॅमसन आणि हार्दिक पंड्या हे दोन खेळाडू मैदानावर उतरतील.
गेल्या काही महिन्यांत करिअरमधील चढ-उतार पाहिलेल्या हार्दिक पंड्या आणि आशिष नेहरा यांनी दोन महिन्यांत गुजरात संघाला अव्वल स्थानी पोहोचवले. आयपीएलच्या मेगा लिलावानंतर गुजरात संघावर मॅच खेळण्याआधीच पराभव झालेला संघ अशी टीका करण्यात आली होती, पण या संघाने मैदानावरील कामगिरीने सर्वांना चोख उत्तर दिले.
'वन मॅच वंडर' असे म्हटले जाणार्या राहुल तेवतिया आणि सातत्याने चांगली कामगिरी करणारा डेव्हिड मिलर सारख्या खेळाडूंचा हा संघ कागदावर मजबूत वाटत नव्हता; पण क्रिकेटसारख्या अनिश्चिततेच्या खेळात या खेळाडूंनी कमाल करून दाखवली. फॉर्ममध्ये परतलेल्या हार्दिकने कर्णधारपदाचा दबाव न घेता फलंदाजी केली. दुसर्या बाजूला पाच वर्षे लय मिळवण्यासाठी धडपडणार्या मिलरने सर्वांना धक्का दिला. तेवतियाने देखील दाखवून दिले की शाहजाहमध्ये मारलेले पाच षटकार हा योगायोग नव्हता.
राशिद खानने त्याच्या भात्यात नवे डावपेच ठेवले आहेत. तर वृद्धिमान साहाने अजून एक हंगाम खेळण्याचे निश्चित केले. गुजरात कधीच क्रिकेटसाठी प्रसिद्ध नव्हते. येथील पार्थिव पटेल आणि जसप्रीत बुमराहसारखे खेळाडू भारतीय संघात खेळले, पण आता चेन्नई सुपर किंग्जप्रमाणे गुजरातमध्ये क्रिकेटची क्रेझ झाली आहे. अंतिम सामन्यात घरच्या मैदानावर खेळण्याचा फायदा गुजरातला होऊ शकतो.
प्रतिस्पर्धी असलेला राजस्थानचा संघ कमी नाही. आयपीएलचे पहिले विजेतेपद त्यांनी वॉर्नच्या नेतृत्वाखाली मिळवले होते. त्यानंतर ते प्रथमच अंतिम फेरीत पोहोचले आहेत. संजू आणि हार्दिक पंड्या यांची क्षमता सारखीच आहे. संजू अशा काही खेळाडूंपैकी आहे ज्याने भारतासाठी अद्याप एकही टी-20 मॅच खेळली नाही, पण त्याची लोकप्रियता अधिक आहे. आता कर्णधारपद आणि मिळालेल्या यशामुळे त्याचा आत्मविश्वास वाढला आहे. आयपीएलच्या पहिल्या हंगामाची विजेतेपदाची माळ राजस्थानच्या गळ्यात पडली होती, तेव्हा शेन वॉर्न कर्णधार होता. तो आता या जगात नाही, आयपीएलचे विजेतेपद मिळवणे यासारखी राजस्थानकडून त्याला दुसरी श्रद्धांजली होणार नाही.
संजूकडे आर. अश्विन, युजवेंद्र चहल, जोस बटलर, ट्रेंट बोल्ड यांसारखे दिग्गज तर यशस्वी जैस्वाल आणि प्रसिद्ध कृष्णा सारखे युवा खेळाडू आहेत. संजूने या सर्वांना सोबत घेत संघाला इथपर्यंत आणले आहे. उद्या होणार्या फायनल सामन्यात नवे हिरो देखील होतील आणि अनेक विक्रम देखील तयार होतील.