

Vaibhav Sooryavanshi U19 Selection: बीसीसीआयने नुकतेच ऑस्ट्रेलिया मालिकेसाठी भारताच्या १९ वर्षाखालील संघाची निवड केली. या संघात भारताचे दोन दिग्गज माजी खेळाडू राहुल द्रविड आणि विरेंद्र सेहवाग यांच्या चिरंजीवांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र भारतीय वरिष्ठ संघाकडून खेळणाऱ्या वैभव सूर्यवंशीला मात्र संघात स्थान देण्यात आलेलं नाही यामुळं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. वैभव फक्त १५ वर्षाचा असून देखील त्याची संघात निवड करण्यात आलेली नाही.
आगामी ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या मल्टी फॉरमॅट सिरीजसाठी सेहवागचा मुलगा आर्यवीर आणि द्रविडचा मुलगा अन्वय यांची निवड करण्यात आली आहे. मात्र १५ वर्षाच्या धडाकेबाज वैभवची निवड केलेली नाही. याबाबत बीसीसीआयचा एक मोठा नियम आडवा आल्याचं सांगितलं जात आहे.
२०१६ मध्ये बीसीसीआयने एक नियम केला होता. एक खेळाडू एकापेक्षा जास्तवेळी १९ वर्षाखालील वर्ल्डकपमध्ये सहभागी होऊ शकत नाही. जरी तो खेळाडू वयाची अट पूर्ण करत असला तरी त्याला फक्त एकाच वर्ल्डकपमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळेल.
म्हणजे जर एखाद्या खेळाडूचे वय १५ किंवा १७ वर्षाचे असेल आणि तो १९ वर्षाखालील वर्ल्डकप खेळला असेल. तर त्याला पुढच्या वर्षी होणाऱ्या १९ वर्षाखालील वर्ल्डकपमध्ये सहभागी होता येणार नाही. या नियमानुसारच २०१८ मध्ये वॉशिंग्टन सुंदरला १९ वर्षाखालील वर्ल्डकप खेळता आला नव्हता. यापूर्वी सरफराज खान, संदीप शर्मा, विजय जोल यांनी १९ वर्षाखालील एकापेक्षा जास्त एडिशनमध्ये भाग घेतला होता.
वैभव सूर्यवंशीने २०२६ मध्ये १९ वर्षाखालील वर्ल्डकप खेळला आहे. त्यामुळं आता त्याला दुसऱ्या एडिशनमध्ये सहभागी होता येणार नाहीये. त्यामुळेच निवडसमितीने त्याला १९ वर्षाखालील संघात स्थान दिलेले नाही. यामुळे नव्या खेळाडूंना संधी मिळते.
भारताचा १९ वर्षाखालील ऑस्ट्रेलिया मालिका हा १८ सप्टेंबर पासून सुरू होणार आहे. यात १८, २१ आणि २३ सप्टेंबर रोजी राजकोटमध्ये तीन वनडे सामने खेळवले जाणार आहेत. त्यानंतर २७-३० सप्टेंबरला राजकोटमध्ये पहिला कसोटी, अन् ५ ते ८ ऑक्टोबर अहमदाबादमध्ये दुसरा कसोटी सामना होणार आहे.