

Virat Kohli Travis Head Fight: आयपीएल 2026 आता अंतिम टप्प्यात पोहोचली असतानाच मैदानावरील रोमांच शिगेला पोहोचला आहे. पण यावेळी चर्चा केवळ चौकार-षटकारांची नाही, तर दोन स्टार खेळाडूंमधील हाय-व्होल्टेज ड्राम्याची आहे. विराट कोहली आणि ट्रॅव्हिस हेड यांच्यात सामन्यादरम्यान झालेल्या शाब्दिक वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.
सनरायझर्स हैदराबादने आपल्या घरच्या मैदानावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला 55 धावांनी पराभूत केले. मात्र, या सामन्याची चर्चा झाली ती कोहली आणि हेड यांच्यातील वादामुळे. विशेष म्हणजे, हा वाद पहिल्या डावात सुरू झाला आणि सामना संपेपर्यंत कायम राहिला.
वादाची सुरुवात कशी झाली?
हैदराबादच्या डावात ट्रेविस हेड जोरदार फलंदाजी करत होता. त्याने आरसीबीचा युवा वेगवान गोलंदाज रसिक सलामच्या एका षटकात सलग तीन चौकार लगावले. मात्र, पुढच्याच चेंडूवर रसिकने अचूक यॉर्कर टाकत हेडला बोल्ड केले.
विकेट घेतल्यानंतर रसिखने कानाजवळ हात नेऊन हैदराबादच्या प्रेक्षकांना इशारा करत सेलिब्रेशन केले. पण खरा ड्रामा तेव्हा सुरू झाला, जेव्हा विराट कोहलीवर कॅमेरा फोकस झाला. कोहली हेडच्या विकेटनंतर प्रचंड आक्रमक दिसत होता. त्याने हेडकडे पाहत हवेत मुठी फिरवत आक्रमक पद्धतीने सेंड-ऑफ दिला. हेड 16 चेंडूत 26 धावा करून बाद झाला होता.
दुसऱ्या डावात शाब्दिक चकमक
विराटचा हा आक्रमक अंदाज ट्रेविस हेडला फारसा आवडला नाही. दुसऱ्या डावात आरसीबी 256 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना वातावरण आधीच तापलेले होते.
हेड मिडविकेटवर क्षेत्ररक्षण करत असताना विराट त्याच्याकडे बोट दाखवत, “या, तुम्हीही गोलंदाजी करा” अशा इशाऱ्यात काहीतरी बोलताना दिसला. यावर हेडनेही प्रतिक्रिया दिली आणि दोघे एकमेकांना काहीतरी बोलताना कॅमेऱ्यात कैद झाले.
व्हायरल व्हिडिओमध्ये विराट कोहली संतापलेल्या अवस्थेत हेडकडे बोट दाखवत बोलताना दिसला. तर शांत स्वभावासाठी ओळखला जाणारा ट्रेविस हेडही यावेळी मागे हटला नाही आणि त्यानेही कोहलीला प्रत्युत्तर दिले. मात्र, नेमका वाद कशावरून झाला हे स्पष्ट होऊ शकलेले नाही.
सामना संपल्यानंतरही तणाव कायम
या दोघांमधील तणाव सामना संपल्यानंतरही दिसून आला. हैदराबादच्या विजयानंतर खेळाडू एकमेकांशी हस्तांदोलन करत असताना ट्रेविस हेडने विराटसमोर हात पुढे केला, मात्र विराटने त्याकडे दुर्लक्ष केल्याचं व्हिडिओत दिसत आहे.
सामन्याचा निकाल काय?
सामन्यात हैदराबादने प्रथम फलंदाजी करत 255 धावांचा डोंगर उभा केला. प्रत्युत्तरात आरसीबीचा संघ 4 बाद 200 धावांपर्यंतच मजल मारू शकला आणि त्यांना 55 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या पराभवानंतरही आरसीबी लीग टप्प्यात अव्वल स्थानावर कायम आहे, तर हैदराबाद विजयासह तिसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे.