

India's Virat Kohli retires from Test cricket after 14 years
नवी दिल्ली : १४ वर्षांचा प्रवास... १२३ सामने... ३० शतके... आणि ९२३० धावा... भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील 'विराट कोहली' एक तेजस्वी अध्याय अखेर संपला. विराट कोहलीने सोमवारी कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. २०११ मध्ये वेस्ट इंडिज विरूद्ध झालेल्या तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात कोहलीने एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली कसोटी पदार्पण केले. पण पहिल्या डावात फक्त ४ धावा आणि दुसऱ्या डावात १५ धावांवर बाद झाला. तीन कसोटी सामन्यात कोहलीला १५ च्या सरासरीने फक्त ७६ धावाच करता आल्या होत्या. पण, या अपयशाने न खचता कोहलीने उणिवांवर काम केले आणि आज तो जगातला सर्वोत्तम फलंदाज, क्रिकेटमधला किंग या नावाने ओळखला जातो.
अपयश ही यशाची पहिली पायरी, विराटचा प्रवासही असाच होता
२० जून २०११ रोजी भारताने वेस्ट इंडिज विरूद्ध जमैकाच्या किंग्स्टन येथील सबिना पार्कवर नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. २३ वर्षीय विराट कोहली कसोटीत पदार्पण करत ६४ धावांवर ३ बाद अशा कठीण स्थितीत मैदानात उतरला. वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज फिडेल एडवर्ड्सच्या सहाव्या चेंडूवर त्याने चौकार ठोकला. पण कोहलीचा पहिला डाव जास्त काळ टिकला नाही, कारण एडवर्ड्सने यष्टीरक्षक कार्लटन बॉघकरवी विराटला झेलबाद केले. त्यामुळे पहिल्या डावात त्याला फक्त ४ धावांवरच समाधान मानावे लागले. दुसऱ्या डावात कोहलीने १५ धावा काढल्या आणि पुन्हा एडवर्ड्सने त्याला झेलबाद केले. भारताने कसोटी सामना ६३ धावांनी जिंकला आणि मालिका १-० ने जिंकली. या कसोटीत विराटने एकुण ७६ धावांची खेळी केली. पहिल्या मालिकेतील धावांची शंभरी गाठू न शकलेल्या विराटने त्याच्या कसोटी कारकिर्दीत १२३ सामन्यांमध्ये ४६.८५ च्या सरासरीने ३० शतकांसह ९२३० धावा केल्या. त्याने ६८ कसोटी सामन्यांमध्ये देशाचे नेतृत्व केले, त्यापैकी सर्वाधिक कसोटी सामने भारतीय संघाने जिंकले, त्यापैकी फक्त १७ गमावले.
झहीर खानची बॉलिंग आणि कोहलीला उणीव लक्षात आली
विराट कोहलीचा कसोटी पदार्पणाचा क्षण जितका विशेष होता, तितकाच तो कठीणही ठरला. देशांतर्गत सामन्यात झहीर खानच्या डावखुऱ्या अँगलवर टाकलेल्या शॉर्ट बॉल्सनी कोहली पूर्णपणे गडबडून गेला होता. त्या अनुभवाने त्याला शिकवलं आणि कोहलीने तो धडा कायमचा मनावर गिरवला. यानंतर विराटने शॉर्ट बॉलवर कसे फटके मारायचे याचा सराव केला.
विराट सांगतो, तुम्ही एका शॉर्ट बॉलवर बाद होणं हे काही चूक नाही. तुम्ही बाद झाल्यावर लोक तुमच्यावर टीका करतील. पण मी याकडे दुर्लक्ष केले. मला इतकंच माहिती असतं की मैदानात फलंदाजीसाठी सकारात्मक दृष्टीकोनाने जावं.
एखाद्या कठीण प्रसंगातही तुमचा सकारात्मक दृष्टीकोन कसा उपयुक्त ठरू शकतो हेच विराटने दाखवून दिले.
दडपण येणार पण हार मानायची नाही!
कसोटी पदार्पणानंतर विराट कोहलीने ईएसपीएन क्रिकइन्फोला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं की, कसोटी सामन्यांचं माझ्यावर दडपण असायचं. पहिल्यांदाच कसोटीत उतरतानाच कुठल्या मानसिकतेत खेळावं हेच समजत नव्हतं. त्यामुळे मी खूपच डिफेन्सिव्ह झालो होतो. वन डे क्रिकेटमध्ये मी कधीच शॉर्ट बॉल्सला फक्त रोखण्याच्या उद्देशाने खेळलो नाही. पण कसोटीत मात्र मी तो टाळायचो आणि बचाव करायचा विचार करत होतो. पण बॉल सोडून बचाव करण्याचा विचार करायला सुरुवात केली की, तेव्हाच तुम्ही अडचणीत सापडता. जर तुम्हाला शॉर्ट बॉल खेळायचा असेल आणि त्यावरून गोल करायचा असेल तर तुम्ही तो खूप चांगल्या प्रकारे सोडू शकता. जे मी इतर दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये केले, कारण माझा हेतू त्यामधून धावा मिळवण्याचा होता आणि मी शॉर्ट बॉल खरोखरच चांगला खेळलो, असं कोहलीने सांगितलं.
पहा, शिका आणि आत्मसात करा, कोहलीचं सूत्र
आजवरचा माझा कसोटी क्रिकेटमधला अनुभव अत्यंत शिकवणारा ठरला आहे, असं कोहलीने एका मुलाखतीत सांगितलं होतं. माझ्यासाठी हा एक उत्तम शिकण्याचा अनुभव होता. याआधी संघात असताना एकही कसोटी सामना पाहिला नाही. एकदिवसीय आणि आयपीएलमध्ये खेळून लगेचच कसोटीसाठी मैदानात उतरलो. संघासोबत फक्त एकच सराव सत्र केले आणि लगेचच कसोटी क्रिकेटमध्ये प्रवेश केला. जितके जास्त तुम्ही वरिष्ठ खेळाडूंना वेगवेगळ्या परिस्थितीत खेळताना आणि कामगिरी करताना पाहता, तितकेच तुम्हाला कसोटी क्रिकेटची चांगली कल्पना येते, असंही कोहली सांगतो.
अपना टाइम आएगा! 50 वन डे सामन्यांनंतर विराटची कसोटीत एंट्री
विराट कोहली हा सुरूवातीपासूनच आक्रमक खेळाडू ओळखला जायचा. वन डे आणि आयपीएलमध्ये त्याची कामगिरी दमदारच होती. टीम इंडियाचा 'वन डे बॉय' अशी प्रतिमाच निर्माण झाली होती. तब्बल 50 एकदिवसीय सामन्यानंतर त्याला कसोटीत संधी मिळाली. विराट सुरूवातीला कसोटीत अडखळला पण थांबला कधीच नाही. कसोटी क्रिकेट हा फॉर्मेट त्याच्यासाठी नवीन होता. पण आंतरराष्ट्रीय वन डे सामन्यात खेळल्याने त्यांची मानसिक तयारी चांगली झाली होती.
तिन्ही फॉरमॅटमध्ये केले टीम इंडियाचे नेतृत्व
टी-20, कसोटी आणि वन डे क्रिकेटमध्ये कोहलीने तिन्ही फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचे नेतृत्वही केले आहे. धोनीच्या निवृत्तीनंतर २०१४ मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर तो पहिल्यांदाच कर्णधार बनला. तेव्हापासून २०२२ मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यापर्यंत तो कसोटी संघाचा कर्णधार राहिला. त्याचवेळी, २०२१ मध्ये, त्याच्याकडून टी-२० आणि एकदिवसीय संघाचे कर्णधारपद काढून घेण्यात आले. कोहलीने २० जून २०११ रोजी सबिना पार्क येथे वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी पदार्पण केले. मेहनत आणि एकाग्र चित्ताने काम करत राहणं हे दोन गूण तुमच्यात असतील तर तुम्ही एक दिवस नक्की लीडर होणार.