

Varun Chakravarthy trolling
कोलकाता : भारतीय फिरकीपटू वरुण चक्रवर्तीने त्याच्या कारकिर्दीतील एका अत्यंत त्रासदायक प्रसंगाचा खुलासा केला आहे. २०२१ च्या आयपीएल (IPL) दरम्यान कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याला सोशल मीडियावर ज्या भीषण ट्रोलिंगला सामोरे जावे लागले, त्या आठवणी त्याने जाग्या केल्या आहेत. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) विरुद्धच्या सामन्यापूर्वी चक्रवर्ती आणि आणखी एक खेळाडू कोरोनाबाधित आढळले होते, ज्यामुळे तो सामना पुढे ढकलण्यात आला होता. त्यानंतर संघांमधील वाढत्या कोरोना केसेसमुळे बीसीसीआयला अखेर स्पर्धा अर्ध्यातच थांबवावी लागली होती.
कोलकाता नाईट रायडर्सच्या (KKR) ताफ्यात वरुण चक्रवर्तीसह वेगवान गोलंदाज संदीप वॉरियर देखील पॉझिटिव्ह आढळला होता. या धक्कादायक अनुभवाबद्दल बोलताना वरुणने सांगितले की, कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याला सोशल मीडियावर लक्ष्य करण्यात आले आणि काही जणांनी तर जीवे मारण्याच्याही धमक्या दिल्या होत्या.
'जर्नी टू जर्सी' या युट्यूब शोमध्ये बोलताना वरुण चक्रवर्ती म्हणाला, "२०२१ मध्ये जेव्हा आयपीएल थांबवण्यात आली, तो काळ माझ्यासाठी सर्वात वाईट होता. माझ्यामुळे आयपीएल अर्ध्यात थांबली असा लोकांचा समज झाला होता, कारण कोरोना पॉझिटिव्ह येणारा मी पहिला खेळाडू होतो. त्यावेळच्या मीडिया रिपोर्ट्सनुसार, वरुण चक्रवर्ती खांद्याच्या उपचारासाठी अधिकृत परवानगी घेऊन बायो-बबलमधून बाहेर गेला होता.तिथेच त्याला संसर्ग झाला असावा, असे म्हटले गेले होते.
वरुण पुढे म्हणाला, "लोक मला शिवीगाळ करत होते. त्या काळात लॉकडाऊनमुळे लोकांकडे विरंगुळ्यासाठी आयपीएल हे एकमेव साधन होते. स्पर्धा थांबल्यामुळे लोक इतके संतापले होते की ते मला म्हणायचे, 'तू मरून का जात नाहीस?' परिस्थिती इतकी भीषण होती."
गेल्या वर्षीच्या आयपीएल हंगामात वरुण चक्रवर्तीने शानदार कामगिरी करत ८३ सामन्यांत ९९ बळी घेतले आहेत. तसेच नुकत्याच पार पडलेल्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये तो भारतासाठी सर्वाधिक बळी घेणारा (जसप्रीत बुमराहसह संयुक्तपणे) गोलंदाज ठरला. त्याने विश्वचषक स्पर्धेत १४ बळी मिळवले, मात्र त्याचा इकॉनॉमी रेट ९.२५ राहिला.