

team india 15 member squad for los angeles olympics 2028 from ipl 2026
नवी दिल्ली : सध्या देशभरात 'इंडियन प्रीमियर लीग २०२६' चा थरार रंगात असून क्रिकेट चाहत्यांवर आयपीएलचा फिव्हर चढला आहे. स्पर्धेतील ४० सामने यशस्वीरित्या पार पडले असून, फायनलसह अद्याप ३० सामने शिल्लक आहेत. या उर्वरित सामन्यांमुळे प्रेक्षकांसाठी आयपीएलचा हा हंगाम अधिकच रोमांचक ठरणार आहे. मात्र, या आयपीएलमधील कामगिरीच्या जोरावर २०२८ च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकसाठी भारताचा १५ सदस्यीय संभाव्य संघ आतापासूनच चर्चेत आला असून, बीसीसीआय या १५ शिलेदारांवर मोठी बोली लावण्याची शक्यता आहे.
२०२८ च्या ऑलिम्पिकसाठी निवडल्या जाणाऱ्या संघात युवा सलामीवीर वैभव सूर्यवंशी याचे नाव अग्रक्रमाने घेतले जात आहे. अवघ्या १५ वर्षांच्या वैभवने आयपीएल २०२६ मध्ये ४०० धावांचा टप्पा ओलांडणारा पहिला फलंदाज ठरण्याचा मान मिळवला असून, सध्या 'ऑरेंज कॅप'वर त्याचेच वर्चस्व आहे. त्याची ही अफाट क्षमता पाहता निवड समिती त्याला ऑलिम्पिकच्या मैदानात उतरवण्याची दाट शक्यता आहे.
त्याचप्रमाणे प्रियांश आर्य आणि अभिषेक शर्मा यांची बॅटही या स्पर्धेत आग ओकत आहे. पहिल्या चेंडूपासून आक्रमक पवित्रा घेण्याची क्षमता असलेल्या या जोडीसोबतच, तिसऱ्या क्रमांकाची जबाबदारी यष्टीरक्षक फलंदाज ईशान किशनवर सोपवली जाऊ शकते. गेल्या सहा महिन्यांतील सातत्यपूर्ण कामगिरीमुळे ईशानने निवड समितीचे लक्ष वेधून घेतले असून, त्याचा फॉर्म असाच राहिल्यास ऑलिम्पिकचे तिकीट त्याला नक्कीच मिळू शकते.
२०२८ ऑलिम्पिकमध्ये भारतीय संघाचे कर्णधारपद अनुभवी सूर्यकुमार यादवकडे सोपवले जाण्याची शक्यता आहे. सूर्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने अलीकडेच टी-२० विश्वचषक २०२६ चे जेतेपद पटकावले आहे. विशेष म्हणजे, त्याच्या नेतृत्वाखाली भारताने अद्याप एकही टी-२० मालिका गमावलेली नाही. जरी सध्याच्या आयपीएल हंगामात सूर्याच्या बॅटमधून धावा निघत नसल्या तरी, त्याच्या नेतृत्वावरील विश्वास कायम असल्याने निवड समिती त्याच्या नावाचा गांभीर्याने विचार करत आहे.
क्रीडाविश्वातील महाकुंभ मानल्या जाणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत तब्बल १२८ वर्षांनंतर क्रिकेटचे पुनरागमन होत आहे. २०२८ च्या ऑलिम्पिकमध्ये पुरुष क्रिकेट स्पर्धा २२ जुलैपासून सुरू होईल, तर सुवर्णपदकासाठीचा अंतिम सामना २९ जुलै रोजी खेळवला जाईल. या स्पर्धेत एकूण सहा संघ सहभागी होणार असून, भारताचा सहभाग निश्चित मानला जात आहे. प्रत्येक खंडातून एक संघ आणि सहावा संघ पात्रता फेरीतून निवडला जाईल. हे सामने लॉस एंजेलिसपासून ५० किलोमीटर अंतरावर असलेल्या पोमोना शहरात, एका तात्पुरत्या स्वरूपाच्या मैदानावर खेळवले जाणार आहेत.
अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, प्रियांश आर्य, ईशान किशन, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, प्रिंस यादव, वरुण चक्रवर्ती.