पुढारी ऑनलाईन डेस्क : स्पर्धेच्या अंतिम सामन्यापर्यंत पोहोचलेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेतील विजेतेपदाचा सामना आज भारत आणि दक्षिण आफ्रिका या तुल्यबळ संघात रंगणार आहे. भारतीय वेळेनुसार आज रात्री ८ वाजता हा सामना सुरु होईल. दरम्यान, बार्बाडोसमध्ये होणाऱ्या या सामन्यावर पावसाचे सावट आहे. जर पावसामुळे सामना रद्द करावा लागला अथवा सामन्याच्या वेळात बदल करावा लागला तर आयसीसीचा नियम काय सांगतो? हे आपण जाणून घेऊ.
हवामानाच्या अंदाजानुसार आजचा सामन्याच्या दिवशी आणि राखीव दिवशी जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अंतिम सामन्यामध्ये पावसाने व्यत्यय आल्यास या सामन्यासाठी आयसीसीने एक दिवस राखून ठेवला आहे. राखीव दिवशीही पाऊस पडल्यास स्पर्धेचे जेतेपद दोन्ही संघात विभागून देण्यात येणार आहे.
आयसीसीने सेमीफायनलसाठी राखीव दिवस ठेवला नाही. पण फायनलसाठी राखीव दिवस आहे. पण, एक्यूवेदरच्या रिपोर्टनुसार, बार्बाडोसमध्ये आज पावसाची ७८ टक्के इतकी आहे. तर रात्रीच्या वेळी पावसाची शक्यता ८७ टक्के वर्तवण्यात आली आहे.
आज होणाऱ्या अंतिम सामन्यात पावसाने व्यत्यय आणल्यास उद्या (दि.३०) आयसीसीने राखीव दिवस ठेवला आहे. परंतु, राखीव दिवशीदेखील मुसळधार पावसाची शक्यता आहे. पण, राखीव दिवशीदेखील सामना रद्द झाला तर आयसीसीच्या नियमानुसार दोन्ही संघांना संयुक्त विजेता म्हणून घोषीत केले जाईल.
टी-20 वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत दाखल झालेले भारत आणि दक्षिण आफ्रिका हे दोन्ही संघ स्पर्धेत एकही सामन्यात पराभूत झालेले नाहीत. स्पर्धेतील सुपर ८ फेरीतील सामन्यात दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात DLS नियमाने विजय मिळवला होता. तर ग्रुप फेरीत भारताची एक लढत पावसामुळे रद्द झाली होती. दोन्ही संघांचे हे अपवाद वगळता त्यांनी सर्व लढती जिंकल्या आहेत.