

T20 World Cup 2026 Semi Finals: आयसीसी टी २० वर्ल्डकप सुपर ८ मध्ये आजचा दिवस खूप महत्वाचा ठरणार आहे. या एकाच दिवसात दोन मोठे सामने असून भारत झिम्बब्वेशी भिडणार आहे तर दुसरीकडं वेस्ट इंडीज दक्षिण अफ्रिकेसोबत लढणार आहे. या सामन्यानंतर सेमी फायनलचे बरेचसे चित्र स्पष्ट होणार आहे. या दोन सामन्यात चार संघांचे चित्र स्पष्ट होणार आहे.
चेन्नईत होणाऱ्या या सामन्यात भारतासमोर झिम्बाब्वेचे मोठे आव्हान असणार आहे. भारताने दक्षिण अफ्रिकेविरूद्धचा सामना ७६ धावांनी गमावल्यानंतर भारताचे रनरेट हे - ३.८० वर पोहचलं आहे. त्यामुळं भारताला हा सामना फक्त जिंकायचा नाहीयेत तर या विजयाचं मार्जिन देखील मोठं ठेवायचं आहे.
भारतासाठी वरची फळी चिंतेची बाब ठरत असून अभिषेक शर्मा आणि तिलक वर्मा हे दोघेही म्हणाव्या तशा फॉर्ममध्ये आलेले नाहीत. इशान किशन एकटा टॉप ऑर्डरची धुरा आपल्या खांद्यावर वाहत आहे. कर्णधार सूर्यकुमार यादवला देखील आपले स्ट्राईक रेट वाढवण्याची गरज आहे.
गोलंदाजीत भारत सध्याच्या घडीला तरी मजबूत दिसत आहे. बुमराह, अर्शदीप, हार्दिक वरूण हे फॉर्ममध्ये आहेत. त्यांच्या जोडीला अजून एक फिरकीपटू असून त्यानं आपली कामगिरी उंचावण्याची गरज आहे.
अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमवर वेस्ट इंडीज विरूद्ध दक्षिण अफ्रिका हा ग्रुप 1 मधील अजून हाय व्होल्टेज सामना होणार आहे. दोन्ही संघ आतापर्यंत सुपर ८ मध्ये अपराजित असून वेस्ट इंडीजने झिम्बाब्वेचा १०७ धावांनी पराभव करत सेमी फायनलसाठी शड्डू ठोकला आहे. तर दक्षिण अफ्रिकेनं बलाढ्य भारताचा पराभव करत सेमी फायनलसाठी आपली दावेदारी सांगितली आहे.
विशेष म्हणजे भारताचं सेमी फायनलचं भविष्य फक्त झिम्बब्वेच्या सामन्यावर नाही. जर दक्षिण अफ्रिकेनं वेस्ट इंडीजला पराभूत केलं तर भारताचा मार्ग सुखकर होणार आहे. मात्र जर चुकून वेस्ट इंजीज जिंकली तर यजमान भारतासाठी सेमी फायनलचा प्रवेश कठीण होऊन बसणार आहे. म्हणजे चेन्नई आणि अहमदाबाद या दोन्ही ठिकाणचे सामने एकमेकांमध्ये गुंतले आहेत.
भारताचा सामना सायंकाळी ७ वाजता सुरू होणार आहे. त्यापूर्वी अहमदाबादमधील वेस्ट इंडीज Vs दक्षिण अफ्रिका हा सामन्याचा निकाल आलेला असेल. जर वेस्ट इंडीज जिंकला तर भारतासाठी ती डोकेदुखी ठरणार आहे. भारत त्याचवेळी सेमी फायनलमध्ये पोहचणार ज्यावेळी भारत आपले दोन्ही सामने जिंकेल आणि दक्षिण अफ्रिका देखील विंडीजपाठोपाठ झिम्बाब्वेला हरवेल.
आजचा सामना दक्षिण अफ्रिकेनं जिंकला तर भारताचा पुढचा सामना वेस्ट इंडीज सोबत आहे. म्हणजे हा सामना क्वार्टर फायनलच ठरणार आहे. जो हा सामना जिंकणार तो सेमी फायनलमध्ये जाणार. मात्र हे समीकरण जर आज वेस्ट इंडीज जिंकली तर उलटं पालटं होणार आहे. कारण त्यावेळी भारताला झिम्बाब्वेनं दक्षिण अफ्रिकेला मात द्यावी यासाठी देव पाण्यात ठेवावे लागतील.