South Africa Defeat India: दक्षिण अफ्रिकेनं २५ वर्षानंतर भारतात कसोटी मालिका जिंकली; टीम इंडियाचा 408 धावांनी पराभव
South Africa Defeat India:
भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यातील दुसऱ्या कसोटीत भारतासमोर विजयासाठी ५४९ धावांचे आव्हान होते. मात्र दुसऱ्या डावात भारतीय संघ १४० धावांपर्यंतच मजल मारू शकला. दक्षिण अफ्रिकेनं दुसरा सामना तब्बल ४०८ धावांची जिंकत २- ० अशी मालिका खिशात घातली. भारताचा हा कसोटी इतिहासातील आतापर्यंतचा धावांच्या बाबतीतला सर्वात मोठा पराभव ठरला.
भारताला व्हाईट वॉश देत दक्षिण अफ्रिकेनं भारतात तब्बल २५ वर्षानंतर कसोटी मालिका जिंकली. याचबरोबर भारताचा हा सेना (SENA) देशांविरूद्धचा मायदेशातील सलग पाचवा पराभव ठरला. यापूर्वी न्यूझीलंडनं भारताला मायदेशात ३-० अशी मात दिली होती.
गुवाहाटी इथं खेळवल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याबद्दल बोलायचं झालं तर प्रथम फलंदाजी करणाऱ्या दक्षिण अफ्रिकेनं पहिल्या डावात ४८९ धावांचा डोंगर उभारला होता. यानंतर त्यांनी टीम इंडियाचा पहिला डाव २०१ धावात गुंडाळला.
दक्षिण अफ्रिकेनं भारताला फॉलो ऑन न देता २६० धावा करत आपला डाव घोषित केला. यामुळं भारतासमोर विजयासाठी ५४९ धावांचे मोठं आव्हान उभं राहिलं.
सामन्याच्या चौथ्या दिवशी टीम इंडियाची अवस्था २ बाद २७ अशी झाली होती. त्यानंतर पाचव्या दिवशी टीमचा टिकाव लागेल याची शक्यता फार नव्हतीच.
पाचव्या दिवशी सिमॉन हार्मेरच्या भेदक माऱ्यासमोर उरल्या सुरल्या टीम इंडियानं देखील नांगी टाकली. त्यानं २३ षटकात ३७ धावा देत सहा विकेट्स घेतल्या.
भारताकडून दुसऱ्या डावात रविंद्र जडेजाने ५४ धावा करत एकाकी झुंज देण्याचा प्रयत्न केला. मात्र केशव महाराजने त्याची ही झुंज संपवली. महाराजने दुसऱ्या डावात दोन विकेट्स घेतल्या.
भारताचा कसोटीतील सर्वात मोठा पराभव (धावा)
घरच्या मैदानावर भारताला 'व्हाईटवॉश' (Clean-sweeps)
घरच्या मैदानावर भारताला कसोटी मालिकेत 'व्हाईटवॉश' (सर्व सामन्यांमध्ये पराभव) मिळाल्याच्या घटना:
०-२ विरुद्ध दक्षिण आफ्रिका, २०००
०-३ विरुद्ध न्यूझीलंड, २०२४
०-२ विरुद्ध दक्षिण आफ्रिका, २०२५
ज्या कसोटी मालिकांमध्ये भारतीय फलंदाजांना एकही शतक झळकावता आले नाही:
विरुद्ध न्यूझीलंड, १९६९/७०
विरुद्ध न्यूझीलंड, १९९५/९६
विरुद्ध दक्षिण आफ्रिका, २०२५/२६
२०२५/२६ च्या दक्षिण आफ्रिका मालिकेतील दोन सामन्यांमध्ये भारतीय फलंदाजांची सरासरी १५.२३ होती. भारतीय संघाची कसोटी मालिकेतील ही दुसरी सर्वात कमी फलंदाजीची सरासरी आहे. यापूर्वी, २००२/०३ च्या न्यूझीलंड दौऱ्यात भारताची सरासरी १२.४२ इतकी कमी होती.

