Ganguly Advice |"उगाच कठोर वागण्याची गरज नाही..." : सौरव गांगुलीने गौतम गंभीरला नेमका कोणता सल्ला दिला?
Sourav Ganguly advice to Gautam Gambhir
कोलकाता : टीम इंडियाचा प्रशिक्षक गौतम गंभीर त्याच्या आक्रमक स्वभावासाठी ओळखला जातो. याचा स्वभावाचा त्याला खेळाडू आणि भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक म्हणून फायदा झाला असला, तरी यामुळे अनेक वादही निर्माण झाले आहेत. विशेषतः आयपीएलमध्ये विराट कोहलीसोबत झालेला त्याचा वाद खूप गाजला. आता यंदाचा आयपीएल हंगाम सुरु होण्यापूर्वी भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली यांनी गौतम गंभीरला मौलाच सल्ला दिला आहे. त्याचबरोबर त्याचे कार्यपद्धतीचेही कौतुक केले आहे.
एक प्रामाणिक स्पर्धक, ज्याला फक्त आणि फक्त जिंकायचे असते
सौरव गांगुली यांनी 'रेव्हस्पोर्ट्स'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, "गौतम गंभीर कदाचित बाहेरून उद्धट किंवा कठोर वाटू शकतो; पण तो एक उत्तम खेळाडू आहे. त्याने उगाच कठोर वागण्याची गरज नाही, कारण मुळात तो एक माणूस म्हणून खूप चांगला आहे. मी त्याच्यासोबत खेळलो असल्यामुळे मला हे माहित आहे की, तो एक प्रामाणिक स्पर्धक आहे ज्याला फक्त आणि फक्त जिंकायचे असते."
गंभीरची खरी कसोटी ५०-षटकांच्या विश्वचषकमध्ये लागणार
"गंभीर नेहमी आपल्या संघाच्या हिताच्या गोष्टी बोलतो. तो फक्त एका खेळाडूचा विचार न करता पूर्ण संघासाठी पोषक वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करतो. नुकतेच गंभीरच्या मार्गदर्शनाखाली भारताने 'चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५' आणि 'टी-२० विश्वचषक २०२६' या दोन्ही स्पर्धा जिंकल्या आहेत. दोन मोठ्या ICC स्पर्धा जिंकून देणारा तो भारताचा पहिलाच मुख्य प्रशिक्षक ठरला आहे.आतागंभीरची खरी परीक्षा २०२७ चा दक्षिण आफ्रिकेतील एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत लागले. तिथल्या खेळपट्ट्या आणि परिस्थिती त्याची परीक्षा घेतील; पण मला खात्री आहे की, त्याच्याकडे असलेल्या संघाच्या जोरावर तो तिथेही नक्कीच यशस्वी ठरेल," असा विश्वासही गांगुली यांनी व्यक्त केला.
कसोटी क्रिकेटमध्ये सुधारणा करण्याची गरज
"कसोटी क्रिकेटमध्ये गंभीरला अजून सुधारणा करावी लागेल. त्यासाठी त्याने खेळपट्टीचा अतिविचार करणे सोडून दिले पाहिजे. खेळपट्टी कशी असेल, हे डोक्यातून पूर्णपणे काढून टाकणे गरजेचे आहे, असा सल्ला देत उदाहरणार्थ, इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत खेळपट्टीच्या बाबतीत तो काहीच करू शकला नाही आणि त्याचे काय परिणाम झाले, ते आपण सर्वांनी पाहिलेच आहे, असेही गांगुली म्हणाला.
चांगल्या खेळपट्ट्यांवर खेळलो, निकाल नक्कीच सकारात्मक
"भारतात खेळताना फिरकीला मदत करणाऱ्या खेळपट्ट्यांची मुळीच गरज नाही. जर आपण चांगल्या खेळपट्ट्यांवर खेळलो, तर त्याचे निकाल नक्कीच सकारात्मक लागतील," असे गांगुली यांनी स्पष्ट केले. दरम्यान, IPL 2026 संपल्यानंतर इंग्लंडमधील वनडे मालिकेआधी भारतीय संघ अफगाणिस्तान आणि आयर्लंड विरुद्ध सामने खेळणार आहे.

