

Gautam Gambhir Villain Comment: भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक आणि माजी सलामीवीर फलंदाज गौतम गंभीरने एका मुलाखतीत माध्यमांबाबत आणि स्वतःबद्दल तयार झालेल्या प्रतिमेबाबत मत व्यक्त केलं. त्याने सांगितलं की, संघाला व्यक्तीपेक्षा मोठे मानल्यामुळेच त्याला अनेकदा व्हिलन म्हणून दाखवले गेले.
स्मिता प्रकाश यांच्या पॉडकास्टमध्ये बोलताना गंभीरने त्याच्या व्यक्तिमत्त्वाबाबत आणि माध्यमांमधील प्रतिमेबाबत मोकळेपणाने मत व्यक्त केले. या चर्चेदरम्यान माजी क्रिकेटपटू रविचंद्रन अश्विनने एकदा गंभीरला भारतातील सर्वात गैरसमज झालेल्या क्रिकेटपटूंमध्ये गणले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना गंभीरने सांगितलं की, चित्रपटांप्रमाणेच प्रत्येक कथेत नायक आणि खलनायक असतो आणि काहीवेळा माध्यमांना पण खलनायक निर्माण करावा लागतो.
गंभीर म्हणाला की, त्याने नेहमीच संघाला एका व्यक्तीपेक्षा मोठं मानलं आहे. क्रिकेट हा संघाचा खेळ आहे आणि संघाची कामगिरीच सर्वात महत्त्वाची असते, हीच भूमिका त्याने सातत्याने मांडली. मात्र या विचारांमुळेच त्याला अनेकदा चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आले, असे त्याने मुलाखतीत सांगितले.
गंभीरच्या मते, अनेकदा त्याच्याबद्दल मत व्यक्त करणारे लोक त्याला वैयक्तिकरित्या ओळखतही नाहीत. सोशल मीडियावरील व्ह्यूज, क्लिक किंवा चर्चेत राहण्यासाठी काहीजण नकारात्मक गोष्टी पसरवतात, अशी टीकाही त्याने केली.
त्याने असेही सांगितले की, जे लोक त्याला खरोखर ओळखतात त्याला त्यांच्या स्वभावाची आणि विचारांची पूर्ण कल्पना आहे. त्यामुळे माध्यमांमध्ये तयार होणाऱ्या प्रतिमेपेक्षा वास्तव वेगळे असल्याचे त्याने सांगितले. गंभीरच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली आहे.